*_____________________*
आटपाडी – आटपाडीच्या मुळ ओढा पात्रातील आणि आटपाडी शहरातील प्रचंड अतिक्रमणांना आटपाडी नगरपंचायतीतील भाजपा व त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचा पाठींबा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी उपस्थित केला आहे .
*शुक्र ओढ्यातील अतिक्रमणे काढा .* या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्याच्या पार्श्वभुमीवर सादिक खाटीक यांनी हा सवाल उपस्थित केला आहे .
आटपाडी तलावापासून आटपाडीकडे झेपावणाऱ्या दोन ओढ्यांच्या पात्रातील आणि आटपाडी शहरातल्या अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर, देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जमीनींवर केली गेलेली सिमेंट काँक्रीटची पक्की व इतर अतिक्रमणे नेस्तनाबुत करा . ही अनेक वर्षापासून करीत आलेलो मागणी दि . ८ सप्टेंबर रोजी पुन्हा सार्वजनिकरित्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून आपण केल्याचे सादिक खाटीक यांनी निदर्शनास आणले .
दि . ९ सप्टेंबर रोजी आटपाडी नगरपंचायतीच्या लेटरपॅडवरील निवेदनाद्वारे नगराध्यक्ष यु . टी . जाधव, उपनगराध्यक्षा सौ . मिनाश्रीताई मनोजकुमार पाटील, गटनेते नगरसेवक ऋषीकेश बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सर्वश्री महेश आप्पासाहेब देशमुख, सौ . ललिताताई अशोक जाधव, डॉ . जयंत शिवाजीराव पाटील, सौ . राधिकाताई शशिकांत दौंडे, सौ . मनिषाताई आबासाहेब नांगरे, अजित शिवाजीराव जाधव आणि स्विकृत नगरसेवक महेश बबन डोंबे यांनी जिल्हाधिकारी महोदयांसह शासनाच्या अनेक अधिकारी महोदयांचे खास लक्ष वेधले आहे . या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याने सर्व ठिकाणच्या अतिक्रमणां संदर्भाने रितसर ठराव घेऊन नगपंचायतीच्या मुख्याधिकांऱ्याच्या सहीने निवेदन देत शासनाकडे धाव घ्यावी असे मला सुचवावेसे वाटते .
आटपाडी तलावाच्या सांडव्यापासून आटपाडी शहराकडे झेपावणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाच्या शुक्र ओढ्यातील अतिक्रमणे तातडीने काढावीत . अशी लक्षवेधी मागणी या पदाधिकाऱ्यांनी नोंदविली आहे . तथापि या ओढा पात्रातील ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास मग ते अतिक्रमण कोणाचेही असो ते नेस्तनाबुत झालेच पाहिजे . हे आपलेही मत आहे .
भाजपा आघाडीच्या आटपाडी नगरपंचायतील १० पदाधिकाऱ्यांनी शुक्र ओढ्यातील अतिक्रमण काढण्याच्या केलेल्या मागणीचे मी जाहीरपणे समर्थन करतो व त्या पदाधिकाऱ्यांचे खास अभिनंदनही करतो . तथापि आटपाडीच्या *मुळ ओढा पात्रावर* बांधण्यात आलेल्या आटपाडी तलावाच्या खालील चार पाचशे वर्षापासून आटपाडीकड़े झेपावणाऱ्या मुळ विस्तीर्ण ओढ्याच्या प्रचंड पात्रात आटपाडी शहरापर्यंत दुतर्फा केल्या गेलेल्या अतिक्रमणांबद्दल या भाजपा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एक शब्द ही त्यांच्या निवेदनात नोंदविला नाही , याचे सखेद आश्चर्य वाटते . त्यांच्या या एकतर्फी भूमिकेकडे मी सर्वांचे लक्ष वेधतो आहे .
आटपाडी शहरा लगतची दीड दोनशे वर्षापासूनची ७ फुटी रुंदीची संरक्षक भिंत ओलांडून ओढा पात्रात केली गेलेली प्रचंड अतिक्रमणे, आटपाडी ओढा ते धांडोरओढा पात्रा पर्यतच्या आटपाडीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शासकीय जागा, देवस्थान इनाम जमीन वर्ग – ३ च्या जमीनीवर केल्या गेलेल्या अतिक्रमणांबद्दलही या भाजपा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते .
आटपाडी तलावाच्या पाणी पुरवठा विहीरीला लागून आटपाडीकडे झेपावणाऱ्या मुळ ओढ्याचे पात्र अंदाजे ७० ते १०० मीटर इतके प्रचंडच होते . पावसाळ्यात दुथड़ी भरून पाणी वाहणाऱ्या पाण्याच्या रुंदीची मर्यादा १५० मीटर पर्यत जात असे . सध्या या ओढ्याचे पात्र संपविण्याची स्पर्धा अनेकांकडून सुरू आहे . काही ठिकाणी अतिक्रमणे एवढी बेफामपणे केली गेली आहेत की दुसऱ्या बाजुचे पात्र आणि पहिल्या बाजुचे पात्र जवळ जवळ एक होत आहे, असे दिसून येते . अनेक राजकीय नेत्यांच्या वरद हस्ताने या अतिक्रमणांना बळकटी मिळाल्याचे सर्वश्रुत आहे . आटपाडी तलावापासून निघणाऱ्या दोन्ही ओढा पात्रांची पुर रेषा निश्चित केली जावी . या ओढा पात्रातील सर्वच अतिक्रमणे तातडीने नेस्तनाबुत केली जावीत . तसेच देवस्थान इनाम वर्ग – ३ जमीनीवरील आणि आटपाडी शहरातील अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर केली गेलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत . ही मागणी मी पुन्हा शासकीय अधिकाऱ्यांसह, सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीकडे करीत आहे .
भाजपा आघाडीच्या पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी शुक्र ओढ्यातील अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे . मग गदिमा नाट्यगृह ते आटपाडी बाजार पटांगण, फरशी पुला लगतच्या ओढ्याला शुक्र ओढाच म्हणतात ना ? मग या ओढा पात्रात खोकी धारकांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येत असलेले प्रचंड विस्तीर्ण लांब गाळे सदृश्य शेड, हे ही शुक्र ओढ्यातील नव्याने सुरु असलेले अतिक्रमण ठरत नाही का ? यासाठी शासनाने खास परवानगी दिली आहे का ? आणि हे गाळ्यांचे लांब शेड अतिक्रमण ठरत असेल तर ते ही, भाजपाईंच्या मागणी प्रमाणे काढायचे का ? यावरही शासनकर्त्यांनी डोळे उघडे ठेवून बघीतले पाहिजे . आणि यथायोग्य कारवाई केली पाहिजे . पुर्वी आटपाडी ग्रामपंचायतीच्या काळात ओढ्यालगत बांधलेल्या गेलेल्या गाळ्यांना आणि व्यापारी संकुलाला शासनाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा होती . ही बांधकामे अनधिकृत ठरली असतील तर या पासून ६० फुट आत ओढा पात्रात उभारण्यात येत असलेली संरक्षक भिंत आणि पुनर्वसीत खोक्यांसाठीचे गाळे अधिकृत ठरतात का ? याची ही चिकित्सा झाली पाहिजे .
सत्तेच्या पदावरील एखाद्या नेत्याने अतिक्रमण केल्यास त्याचे पद बरखास्त केले जात असेल तर आटपाडी शहराच्या अतिक्रमण वाढीस अप्रत्यक्ष – प्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या काही लोकप्रतिनिधींवर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का ? अशी विचारणा सादिक खाटीक यांनी केली आहे .
आटपाडी शहरातल्या आणि आटपाडीच्या दोन्ही ओढा पात्रातल्या अतिक्रमणा संदर्भाने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण आदरणीय लोकायुक्त महोदयांकडे अथवा शासनाच्या उच्च पदस्थ अधिकारी महोदयांकडे दाद मागणार असल्याचे सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले .
Post Views: 21