इस्लापूर / नांदेड – इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यानजीक पैनगंगेच्या नदी पात्रात अडकलेल्या पाच महिला व दोन बालकाला भोई बांधवांच्या मदतीने तराफ्याच्या साह्याने वाचवण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. पैनगंगेच्या मध्यभागी असलेल्या उंच ठिकाणी खडकांच्या ( बेट) आसरा घेवून त्या पाच मजूर महिला व लहाण बालकाला घेऊन थांबल्या असल्याने पुढील अनर्थ टळला.
हिमायतनगर तालुक्यातील मंगरुळ,वारंगटाकळी शिवारात पैनगंगेवर असलेल्या बंधाऱ्याचे सहस्त्रकुंड पर्यटन स्थळाला पुर्व सुचना न देता एकदाच अनेक दरवाजे ( गेट) उघडल्याने पैनगंगा नदी पात्रात मोठा एकदाच पूर आला.त्याच वेळेस सुरूवातीला नदीत पाणी कमी असल्याने विदर्भाती एकंबा गांवच्या महिला मजूर मराठवाड्याच्या हद्दीतील इस्लापूर गावाकडून नदी पार करीत होत्या.

यामध्ये अनुसया दिगंबर ताळमवाड वय ५० वर्ष, पुजा दिगंबर ताळमवाड वय २० वर्ष ,गजराबाई शिवाजी काटेवाड वय ३५ वर्ष, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड वय २६ वर्ष, विनायक ज्योतीराम गांधरवाड वय ८ महिणे, कामीनी ज्योतीराम गांधरवाड वय ५ वर्ष, कोमल शिवाजी काठेवाड वय १७ वर्ष, रा. सर्व एकंबा ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचा समावेश होता.
नदी पात्राच्या मध्यभागी गेल्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. प्रसंगावधान राखून नदी पात्रात असलेला उंच ठिकाणी असलेल्या खडकावर ( बेटावर) त्या पाच ही महिलांनी दोन लहाण बाळासह त्यांनी आश्रय घेतला. त्यामुळे त्यांचा जिव वाचला. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होवून मदत कार्यास गती दिली.

घटनास्थळी तहसीलदार शारदा चौंडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र मळघणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. स्थानिक पोलीस व विदर्भातील बिटरगाव ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान भोई बांधव रामलू गंटलवाड, दत्ता उटलवाड, सुनिल भट्टैवाड, दत्ता चौपलवाड, अनिल भट्टेवाड, पांडुरंग मागीरवाड यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तराफ्याच्या साह्याने सर्वाना बाहेर काढले आहे. सर्वजन आता सुखरूप आहेत. सदर बचाव कार्याची मोहीम ही जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व महसूल चे सह सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलिस उपनिरीक्षक कोमल कागणे, पो काॅ ओमप्रकाश डिडेवार, पोकाॅ प्रफूल जाधव, बिटरगाव पोस्टेचे जमादार संतोष चव्हाण, दत्ता कवडेकर यांनी ही राबविली आहे.
आ. केराम यांनी साधला नदीपात्रात अडकलेल्या महिलांशी संवाद
सदर घटनेची माहिती सर्वत्र वार्यासारखी पसरली. याबाबत माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत आरंडकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी आमदार भिमराव केराम यांना उपरोक्त घटनेची माहिती दिली. दरम्यान आमदार भिमराव केराम यांनी प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करूण बचाव कार्याची माहिती जाणून उपयूक्त सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.बचावकार्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आमदार भिमराव केराम यांनी भ्रमणध्वनीवरुन अडकलेल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करूण त्यांना धिर दिला आहे.
























