वैराग – बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथे एकता महिला मंचाच्या वतीने ‘मी विधवा नव्हे, मी स्त्री’ या अभिनव उपक्रमांतर्गत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील कलागुणांना वाव देणे आणि सामाजिक जनजागृती करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत एकता महिला मंचाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते. तसेच उद्योजिका भाग्यश्री मोरे, एकता महिला मंच तालुका उपप्रमुख नूरजहा शेख, तालुका सचिव जस्मिन शेख आणि रोहिणी गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण
महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘गाण्याच्या भेंड्या’ आणि ‘संगीत खुर्ची’ यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
१. गाण्याच्या भेंड्या स्पर्धा:
प्रथम क्रमांक: नूरजहा शेख
द्वितीय क्रमांक: प्रणाली गरड
तृतीय क्रमांक: रुपाली गरड
२. संगीत खुर्ची स्पर्धा:
प्रथम क्रमांक: पूजा कराड
द्वितीय क्रमांक: भाग्यश्री गरड
तृतीय क्रमांक: प्राजक्ता शिंदे
मान्यवरांचे मार्गदर्शन
उद्योजिका भाग्यश्री मोरे यांनी महिला सक्षमीकरण आणि उद्योगाच्या संधींबाबत सविस्तर माहिती देत महिलांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. प्रभाकर क्षीरसागर यांनी ‘मी विधवा नव्हे, मी स्त्री’ या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली.
आनंदमयी वातावरण
कार्यक्रमादरम्यान महिलांनी एकमेकींना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या. विशेषतः कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर फोटो काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. चांदवाडी गावातील महिलांची ही उपस्थिती आगामी काळातील महिला चळवळीला बळ देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित तालुका उपप्रमुख नूरजहाँ शेख, तालुका सचिव जास्मिन शेख करिष्मा शेख,संगीता क्षीरसागर, मैनाबाईजाधव,दिपाली गरड,व अन्य सदस्या मोठया संख्येने उपस्थिती होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा शेख यांनी केले, प्रास्ताविक प्रभाकर क्षीरसागर यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार नूरजहा शेख यांनी मानले.

















