सोलापूर : इतिहासात अनेक राष्ट्रांनी तोफा आणि तलवारींच्या बळावर साम्राज्ये उभारली; पण ती साम्राज्ये कालौघात लयास गेली. भारताने मात्र कोणत्याही भूमीवर आक्रमण न करता जगाच्या मनावर अधिराज्य गाजवले; ते योगाच्या, आयुर्वेदाच्या, ज्ञानाच्या आणि जीवनमूल्यांच्या बळावर. “भारत ही केवळ एक भूमी नाही, तर एक अनुभूती आहे. भारताची खरी शक्ती आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यात नसून तिच्या सांस्कृतिक संचितामध्ये आहे,” असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) माजी अध्यक्ष डॉ. विनय प्रभाकर सहस्रबुद्धे यांनी येथे केले.
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त महाविद्यालय) येथे व्यवस्थापन विभागाच्या (एमबीए, बीबीए, बीसीए) वतीने गुरुवारी (दि. ३०) ‘भारताची सौम्य संपदा (सॉफ्ट पॉवर ऑफ इंडिया)’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य माधव देशपांडे उपस्थित होते.
संसद, शिक्षण, संस्कृती आणि भारतीय विचारविश्व अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी केलेल्या या व्यासंगी वक्त्याने तासाभराच्या मर्मग्राही विवेचनातून श्रोत्यांना भारतीय संस्कृतीच्या अंतरंगाची सफर घडविली.
जागतिकीकरण, उदात्तीकरण आणि खासगीकरणाच्या रेट्यात जग ‘सपाट’ होत चालल्याचे थॉमस फ्रीडमनसारखे विचारवंत सांगतात; पण अशा सपाट होत जाणाऱ्या जगात एखाद्या राष्ट्राचे वेगळेपण टिकते ते केवळ त्याच्या संस्कृतीमुळे, याकडे डॉ. सहस्रबुद्धे यांनी लक्ष वेधले. “संस्कृती तेव्हाच जिवंत राहते, जेव्हा तिची गाथा जिवंत राहते. आपली ओळख आणि अस्मिता आपल्याला कुटुंबामुळे आणि देशामुळे मिळते; म्हणूनच स्वभाषा, स्वदेशी आणि स्वसंस्कृती यांचे महत्त्व प्रत्येक पिढीने समजून घेतले पाहिजे,” हे त्यांचे उद्गार उपस्थित तरुणाईला अंतर्मुख करून गेले.
‘नित्य नूतन आणि चिर पुरातन’ अशा समर्पक शब्दांत त्यांनी भारतीय संस्कृतीचे मर्म उलगडले, तेव्हा सभागृहात उत्स्फूर्त दाद उमटली. गंगेचा प्रवाह हजारो वर्षांचा; पण तिचे पाणी क्षणोक्षणी नवे असते. वटवृक्षाची मुळे मातीत खोलवर रुजलेली; पण त्याला फुटणारी पालवी दरवर्षी कोवळीच असते. भारतीय संस्कृतीही अशीच : वेदकाळाइतकी पुरातन, तरीही प्रत्येक नव्या युगाशी संवाद साधत स्वतःला नव्याने घडविणारी. इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस यांसारख्या समकालीन संस्कृती इतिहासाच्या संग्रहालयात विसावल्या; भारतीय संस्कृती मात्र आजही जिवंत, प्रवाही आणि बहरत राहिली आहे. या चिरंजीवित्वाचे रहस्य याच नित्य नूतनतेत आणि चिर पुरातनतेत दडले आहे.
भारताची सौम्य संपदा नेमकी कशात आहे, याचा वेध घेताना त्यांनी योग, आयुर्वेद, भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कार, विविधतेतील एकता आणि कला, साहित्य व अध्यात्म यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी भारतीय संस्कृतीच्या गाभ्याशी असलेल्या आठ चिरंतन मूल्यांची मांडणी केली : आध्यात्मिक लोकशाही, अनेकतेत एकता, व्यक्ती आणि समष्टी यांचा समतोल, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ ही सौंदर्यदृष्टी, निसर्गपूजेची परंपरा, स्त्री-पुरुष समानतेचा विचार, अंत्योदयाची तळमळ आणि विश्वस्त वृत्ती (ट्रस्टीशिप). ही मूल्येच भारताला जगाच्या व्यासपीठावर वेगळी उंची देतात, असे ते म्हणाले.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे अवघे विश्व हेच कुटुंब मानणाऱ्या या संस्कृतीने जग जिंकले ते तलवारीच्या धारेवर नव्हे, तर संस्कृतीच्या, ज्ञानाच्या आणि मूल्यांच्या बळावर, असे सांगताना त्यांनी महात्मा गांधीजींच्या ‘माझे जीवन हाच माझा संदेश’ या उक्तीचा दाखलाही दिला. आजच्या तरुणांनी ही सौम्य संपदा केवळ अभिमानाने मिरवू नये, तर ती समजून घेऊन जगापुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. प्रीतम कोठारी यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे स्वागत प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी केले. प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ. रजनी शिरसागर यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन डॉ. अनिता सद्दलगी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनाली म्हेत्रे यांनी केले. यावेळी प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान संपल्यानंतरही सभागृहात रेंगाळलेली विचारांची स्पंदने हीच या कार्यक्रमाच्या यशाची खरी पावती ठरली.
Post Views: 7