सोलापूर – अंगणवाडी केंद्रांमधून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून राज्यभर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. निकृष्ट आहाराच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील पोषण आहाराची ४८ तासांत प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री नोंदी न तपासता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या ताटात जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची पडताळणी होणार आहे.
आयुक्तांनी २२ ऑगस्ट रोजी सुटीच्या दिवशीही आदेश काढून नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही तपासणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. आहाराचा दर्जा समाधानकारक नसल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो तातडीने बदलून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनीही काही अंगणवाड्यांना अचानक भेटी देऊन फेरतपासणी करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीनंतरही आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तपासणीचा सविस्तर अहवाल मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत आयुक्तालयाला सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
चौकट
तक्रारींचा पाढा वर्षानुवर्षांचा
अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गेल्या सहा-सात वर्षांपासून तक्रारी होत असल्याचा दावा महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीने केला आहे. तांदूळ, डाळ, खिचडी, शिरा, वाटाणा आणि भरडा यांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत. खिचडीला दुर्गंधी येणे, शिरा बेचव असणे, तसेच वाटाणा अनेक शिट्ट्या होऊनही न शिजणे, अशा तक्रारींमुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोट
सोलापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष तपासणी सुरू
आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. आहाराचा दर्जा, साठवणूक, वितरण व्यवस्था तसेच लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. निकृष्ट आहार आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो बदलून घेण्याबरोबरच वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
कोट
‘फक्त पाहणी नको, प्रयोगशाळेतील अहवालही हवा’
“निकृष्ट पोषण आहाराचा प्रश्न आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याबाबत आवाज उठवत आहोत. ४८ तासांत तपासणीचे आदेश देणे ही चांगली बाब आहे; मात्र तपासणी कागदावर न होता प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची झाली पाहिजे. आहाराचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल सार्वजनिक करावेत. दोषी पुरवठादारांवर कठोर कारवाई झाली तरच या तपासणीला अर्थ राहील,” अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी केली.
चौकट
आता कसोटी प्रशासनाची
अंगणवाडी पोषण आहार हा केवळ एका योजनेचा भाग नसून बालकांच्या आणि मातांच्या पोषणाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे ४८ तासांच्या तपासणीत नेमक्या किती अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट आहार आढळतो, नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात का आणि दोषी पुरवठादारांवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. तपासणीचा अहवाल कागदावरच राहणार की त्यातून पोषण आहाराच्या गुणवत्तेत कायमस्वरूपी सुधारणा होणार, हेच या कारवाईचे खरे फलित ठरणार आहे.