
सोलापूर – अल-निनोच्या प्रभावामुळे येणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले. उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात यावा, तसेच पाण्याची गळती, गैरवापर आणि थेट जलाशयातून उपसा शेतीसाठी होणे याबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अल- निनो व टंचाईच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रवीण पाटील, अधिक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सपताळे, उप अभियंता सोलापूर महानगरपालिका एस. व्ही. एकबोटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आर्यन पवार, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन सुचेता डुंबरे, कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर जी. एस. कथले, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण डॉ. एम. जे. शेख, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन ए. एस. तांबे, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.
*जलप्रकल्पांतील उपलब्ध साठ्याचा आढावा सादर करण्याचे आदेश-
जलसंपदा विभागाने लघु, मध्यम बंधारे व धरणे या जलप्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती सादर करून पाण्याचे नियोजन करावे. त्याचा आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्ह्यातील जल प्रकल्पांबाबत सध्या उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजलप्रकल्प आहेत. यापैकी 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल, अशी माहिती देण्यात आली. तसेच उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे अधीक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर यांनी सांगितले.
पंढरपूर येथील पिराची कुरोली येथील पाणी पंढरपूरला घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांनी सांगितले. घाटणी बंधाऱ्यातील पाणी कोळेगाव बंधाऱ्यात सोडल्यास 15 जुलैपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती देण्यात आली.
*शेतीपंपांचे डायरेक्ट कनेक्शन बंद करण्याबाबत सूचना-
उजनी जलाशयाच्या पाण्यासाठी शेतीपंपाचे डायरेक्ट कनेक्शन बंद करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असे अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले. कमी पाण्यावर येणारी पिके आणि आंतरपिके घेऊन, कमीत कमी येणाऱ्या पावसावर मूग आणि उडीद वगळता इतर पिके घेण्याचा सल्लाही देण्यात आला.
*भरारी पथके –
भरारी पथकांमार्फत गैरवापरावर तात्काळ कारवाई
भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत भरारी पथके तयार करण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल, अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा.
तसेच जलसंपदा विभागातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची गळती होत असल्यास ती तात्काळ थांबवण्यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या. नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, महापालिका यांच्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती होत असल्यास ती दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले.
*पाणीबचतीसाठी जनजागृती आणि दैनंदिन वापरावर निर्बंध-
अल-निनोमुळे संभाव्य दुष्काळाचा धोका लक्षात घेऊन सर्व नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पाणीबचत आणि काटकसरीने पाण्याचा वापर याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यास सांगण्यात आले.
ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे महत्व समजावण्याबाबत जिल्हा परिषदेचे सी.ओ. बीडाओ यांनी सूचना द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले. शहरातील स्विमिंग पूल व वाहन धुण्याचे सेंटर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या.
*चारा छावण्या आणि टँकर पाणीपुरवठा व्यवस्थापन-
ज्या भागात टँकरची मागणी येईल, त्या दिवशी त्या गावात टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी आदेश निघणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने चारा छावण्या उभारण्याची वेळ येणार नाही, असा प्लॅनिंग करून तो पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
*प्रांत अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन व तात्काळ तयारी-
प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आढावा बैठका घेऊन पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच आजच भरारी पथकासाठी विविध विभागांनी कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केले.
तसेच दूरदृश्य प्रणालीवरून सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका स्तरावरील तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.






















