जेऊर – वेगाने बदलणाऱ्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित व आध्यात्मिक शिक्षणाची नितांत गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये, सकारात्मक विचार आणि भारतीय अध्यात्माची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने स्वामी चिंचोलीच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डीकेआयएस (SSC) विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिंधू यादव तसेच सीबीएसई विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृशाली बागुल यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आळंदी येथील ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे, श्री प्रकाश महाराज काळे अध्यक्ष ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी, महाराज तसेच ह.भ.प. प्रल्हाद महाराज बोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याचबरोबर माजी शिक्षणाधिकारी श्रीकृष्ण कांत चौधरी माननीय अध्यापक श्री निवृत्ती महाराज गलांडे लोकमतचे पत्रकार श्री पऱ्हाड सर, तसेच शीतल इनामदार, उद्योजक पुणे व श्रीराम जयंती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्रीराम मंदिर स्वामी चिंचोली हे देखील विद्यार्थ्यांना संबंधित करण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य, ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृतीतील अध्यात्माचे महत्त्व आणि आधुनिक जीवनात ज्ञानेश्वरीतील विचारांची उपयुक्तता याविषयी अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्तपणे लाभ घेत विविध प्रश्न विचारून ज्ञानेश्वरीविषयीची आपली जिज्ञासा व्यक्त केली.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण नव्हे तर संस्कारक्षम व मूल्याधिष्ठित शिक्षणाचीही तितकीच आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास, कर्तव्यभावना आणि मानवतेची जाणीव निर्माण होते. त्यामुळे बदलत्या शिक्षण व्यवस्थेत आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश ही काळाची गरज बनली आहे.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, संस्थेच्या सचिव सौ माया झोळ मॅडम, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज झोळ सर तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत साहित्याची ओळख होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.