सोलापूर – उन्हाच्या तीव्रतेमुळे एसटीमधून प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मात्र या एसटी गाड्या सोलापूरला जाताना दोन ते तीन ठिकाणी बंद पडत असल्यामुळे भर उन्हात प्रवाशांना दुसर्या एसटीच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. दक्षिण सोलापूर व मंद्रूप परिसरात दररोज दोन ते तीन एसटी गाड्या बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर आगारातून मंद्रूप परिसरात भंडारकवठे, कुसूर, तेलगाव, टाकळी, औराद, कंदलगाव ,वडापूर व कारकल या गावांसाठी एसटी गाड्या सोडण्यात येतात. सोलापूरहून निघालेल्या एसटी गाड्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहेत. भर दुपारी एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या एसटीसाठी उन्हातच ताटकळत बसावे लागत आहे. शिवाय तिकीट काढल्यामुळे दुसऱ्या वाहनांनी प्रवासही करता येत नाही. यामुळे प्रवाशांचे तारांबळ होत आहे . ज्येष्ठ नागरिक , महिला व शालेय विद्यार्थी एसटीने प्रवास करीत असतात. मात्र सोलापूरला पोहोचण्या अगोदरच वारंवार एसटी गाड्या बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
यामुळे ज्येष्ठ नागरीक व महिलांचे वाहक व चालकांशी वाद होत आहेत. मंद्रूप परिसरात कामचलाऊ व रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाड्या सोडण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमधून लोकप्रतिनिधी व आगार प्रमुखां विरोधात नाराजी दिसून येत आहे . कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून याबाबत पाठपुरावा करण्यात येत नसल्यामुळे प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ऐन ऊन्हाळ्यात वाहक व चालक यांनाही एसटी दुरुस्त करून रस्त्यावर आणण्यासाठी उन्हातच दुरुस्ती करावे लागत आहे. त्यामुळे वाहक व चालक यांचीही कसरत दिसून येत आहे . मात्र आगारातूनच नादुरुस्त व बिघडलेल्या गाड्या ग्रामीण मार्गावर सोडण्यात येत असल्यामुळे वाहक व चालक यांच्यासह प्रवाशांनाही त्रास सहन करावे लागत आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी व आगार प्रमुख यांनी सुस्थितीत असणाऱ्या गाड्या मंद्रूप मार्गावर सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे .
…,
प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
….
दक्षिण तालुक्यातील सीना भीमा नदी परीसरात एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र प्रवास करताना एसटी रस्त्यावरच बंद पडत असल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आमदार, सभापती, जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्यासह सर्व गावाच्या सरपंचांचे प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
….
बंद पडणार्या एसटीमुळे कामावर परीणाम
…
दररोज एसटीने सोलारला कामाला जातो. सकाळी साडेनऊ वाजता एसटीमध्ये बसल्यानंतर दहा वाजेपर्यंत कामावर हजर राहण्याचे ठरविले असते. मात्र एसटी रस्त्यातच बंद पडल्यामुळे कामावर जाण्यासाठी एक ते दिड तास उशिर होत आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून बोलणे खावे लागते.
श्रीशैल लिगाडे, प्रवाशी मंद्रुप





















