सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने अभिजीत पाटील यांनी गुडघे टेकले आहेत. सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत करा अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं अभिजीत पाटील यांनी सांगितलं. भाजप प्रवेशाची कोणतीही अट आम्हाला घालण्यात आलेली नाही. मात्र लोकसभेला आम्हाला मदत करा अशी अट घातली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी जो कुणी आम्हाला मदत करेल त्याला आम्ही मदत करू अशी माहिती अभिजित पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.
शिखर बँकेनं तब्बल चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण समोर करत अभिजीत पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी दाखल झाले. शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली.दे वेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अट घातली नसून आम्ही तुमच्या कारखान्याला मदत करू, लोकसभेत तुम्ही आमची मदत करा ही अट घातली आहे. शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी येत असतात असं पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर केलं. त्यांच्या भूमिकेचा फटका महाविकास आघाडीला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात फटका बसू शकतो.
बंद पडलेला साखर कारखाना अभिजित पाटलांनी उर्जितावस्थेत आणला, पण…
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या कार्यकाळानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला घरघर लागली होती. करोना काळात भारत नाना भालके यांच्या मृत्यूनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अभिजित पाटील यांनी सोन्याचे दिवस दाखवले. तीस हजार सभासदांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटील यांच्यामुळे राज्यभर चर्चेत आला होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अभिजीत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात राष्ट्रवादीची ताकद वाढवली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि माढा लोकसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांची क्रेझ आहे. विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून त्यांची लोकप्रियता आणि नेटवर्क वाढल्यानं भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.
राज्य सहकारी शिखर बँकेकडून जप्तीची कारवाई
राज्य सहकारी शिखर बँकेने चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण देत विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला. साखरेची जवळपास एक लाख पोती ठेवण्यात आलेलं गोदामदेखील सील केलं होतं. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केल्यानं अभिजीत पाटील जबरदस्त आर्थिक कोंडीत अडकले आहेत. राज्य सरकारच्या मदतीशिवाय अभिजीत पाटलांसमोर पर्याय राहिलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारपासून माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेत आहेत. दोन दिवसांपासून सोलापुरात फक्त अभिजीत पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अभिजीत पाटील काल रात्रीच फडणवीसांची भेट घेणार होते. पण प्रचारसभा लांबल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही.
अभिजीत पाटलांच्या मदतीमुळे सोलापूर, माढ्यात गेम फिरणार?
पंढरपूर तालुका लोकसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये येतो. पंढरपुरातील ५८ गावं माढ्यात येतात. इथल्या मतदारांची संख्या १ लाख ६० हजार इतकी आहे. तर सोलापुरात अडीच ते लाख मतदान येतं. पंढरपूरमध्ये अभिजीत पाटील यांची चांगली ताकद आहे. माढा, सोलापुरात त्यांचं वर्चस्व आहे. पंढरपूरपासून अक्कलकोटपर्यंत त्यांचं नेटवर्क आहे. त्यांच्या मागे तरुणांची मोठी फळी आहे. त्यामुळे मतदान खेचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. अडचणीत आलेल्या अभिजीत पाटलांनी भाजपला मदत केल्यास त्याचा फटका सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना, तर माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना बसेल.