*आमदार राजेश पवार घेणार शेतकऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय!*
*[मतदार संघात साखर कारखाना काढण्यासाठी जागा पाहणी सुरू!
उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे आता आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून अगदी तंतोतंत सहकार तत्त्वावर चालणारा व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारा मोठा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जागा पाहणी चालू केल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्या पार्श्वभूमीवर मात्र तथाकथित मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आमदार राजेश पवार हे धाडसी निर्णय घेऊन त्या निर्णयाची पूर्तता करणारच अशी ख्याती अख्या नायगाव मतदारसंघात पसरली आहे. नायगाव मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र, गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने पसरलेले सुपीक खोरे, भारतभर जोडणारी दळणवळण यंत्रणा, वीज, पाणी, रस्ते, आदी कारखानदारीसाठी असलेल्या अनुकूल गोष्टी आमदार राजेश पवार यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत!
पश्चिम महाराष्ट्र हा सहकार तत्वावर साखर कारखान्यासहित वेगवेगळे उपक्रम अगदी प्रामाणिकपणे राबवून अग्रेसर राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच सहकार तत्वे प्रामाणिकपणे अमलात आणल्यामुळे भरभराट झाली.
पण मराठवाड्यात जे काही साखर कारखाने चालू आहेत आणि बंद पडलेले आहेत ते निव्वळ तथाकथित मंडळींना चरण्यांचे कुरण बनले आहे. त्यातच शेतकऱ्यांची भयंकर लूट होत असते. मनाजोगा ऊसाला भाव मिळत नसतो, भाव मिळाला तर वजनामध्ये काटा मारणे,त्यांच्या बिलांचे पैसे वेळेवर न मिळणे अशा गोष्टी घडत असतानाच या साखर कारखान्यामध्ये राजकारण पण घुसल्या गेले आहे. आम्हाला मतदान केले तरच तुमचा ऊस कारखान्यावर नेवू नाहीतर तो तसाच सडून जाईल अशा धमक्याही जे आज घडीला साखर कारखाने चालू आहेत त्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना आलेल्या असल्याच्या बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत.
नायगाव मतदारसंघातील तीनही तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र हे कारखान्यासाठी अनुकूल असून सुजलाम सुफलाम आहे आणि या भागातील गोदावरी मनार सारखा साखर कारखाना बंद झाला.त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. एकंदरीतच उपरोक्त सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हे साखर कारखाना काढण्यासाठी जागा पाहणी करत असल्याच्या प्रतिक्रिया गेल्या दोन महिन्यापासून येत आहेत.
आज दैनिक देशोन्नतीने थेट त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. आपण खरोखरच साखर कारखाना काढणार का? असा प्रश्न विचारला असता होकार किंवा नकार न देता पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे सहकार तत्वावरील साखर कारखानेच नव्हे तर अनेक उपक्रम आपण प्रामाणिकपणे आपल्या मतदार संघात राबवू, त्यामध्ये शेतकऱ्यांनाही भागीदारी देऊ आणि सहकार तत्वावरील साखर कारखाना कसा असतो, त्यामुळे आपल्या भागाचा विकास कसा होतो,
प्रत्येक शेतकऱ्यांचे जीवनमान दिवसागणिक कसे उंचावते हे आपण दाखवणारच आहोत अशा प्रतिक्रिया देत अनुकूल जागा मिळताच आपण कुठलीही हयगय न करता साखर कारखाना बांधणी चालू करणार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
आमदार राजेश पवार हे खरोखरच असे धाडसी निर्णय घेतात व ते सत्यात उतरतात हे मतदारसंघाले पाहिले असल्यामुळे त्यांच्या उपरोक्त निर्णयामुळे तथाकथितां मध्ये एकच खळबळ उडाली असून मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये मात्र एक आश्वासक विश्वासक वातावरण निर्माण होत आहे.
नायगाव मतदार संघ परिक्षेत्रात नवीन साखर कारखाना टाकण्यासाठी मार्गदर्शन व जागा अवलोकन करण्यासाठी साखर कारखाना उभारणीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कंपनी ची एक टीम आमदार राजेश पवार यांनी मतदार संघात सर्वेसाठी नेमली असून गेल्या दोन महिन्यापासून त्या तज्ञ टीमचे सर्वे चालू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.