फुलंब्रीच्या पहिल्या आमदार होत चव्हाण यांनी बागडे नानांचा गड अबाधित राखला
अनुराधा चव्हाण यांनी १ लाख ३५ हजार मत घेत ३२ हजार ५०१ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव
छत्रपती संभाजीनगर :
फुलंब्री विधानसभा मतदार संघात मी भाजप शिवसेना महायुतीच्या वरिष्ठांनी मला संधी दिली. त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आज हा ऐतिहासिक विजय खेचून आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. विरोधकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला माझी जात आणि धर्म हा विकास आहे, त्यामुळे मी आतापर्यंत केलेला विकास जनतेसमोर मांडला. फुलंब्री मतदारसंघाला विकसित करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या व्हिजनला जनतेने स्वीकारले आहे. आता माझी जबाबदारी वाढली असून महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातील विकासाच्या रथाला पुढे घेऊन जायचे आहे, असे मत फुलंब्री विधानसभेच्या नवनियुक्त पहिल्या महिला आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी शनिवारी (दि. २३) रोजी व्यक्त केले. त्यांनी १ लाख ३५ हजार मत घेत ३२ हजार ५०१ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
यावेळी बोलताना अनुराधा चव्हाण म्हणाला की, या मातीतील माणसांनी विकासासाठी आणि कल्याणासाठी मला मतदान रुपी आशीर्वाद दिले. मी फुलंब्री मतदार संघातील जनतेला शब्द देते की, मी माझे आयुष्य मतदारसंघातील विकासासाठी समर्पित केले आहे. इथल्या विकासाच्या प्रत्येक विटेमध्ये आणि इथल्या माणसाच्या सुख-दुःखामध्ये मी कायम वाटेकरी आहे आणि सदैव राहील. त्यामुळे गाव खेड्यातून मला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद मिळाले असून येत्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेची सेवा करून कायम त्यांच्या ऋणात राहणार असल्याचे मत अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केले.
निवडणूक जनतेने हाती घेतली :
गेल्या दहा-बारा वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्यामुळे मतदार संघातील गाव खेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत विविध पदावरती काम करत असताना विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्न केले आणि निरंतर करत राहील. याच कामाची पावती म्हणून माझी निवडणूक पक्षातील सर्व लाडक्या भावांनी, बहिणींनी आणि सर्वसामान्य जनतेने हातात घेऊन विजयी केले. मतदारसंघातील जनतेने मतदान रुपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले असून विकासाची गंगा तैवत ठेवण्याच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. असा निर्धार अनुराधा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यपाल बागडे नानांची उत्तराधिकारी अनुराधा चव्हाण :
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी आणि महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नानांनी आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराजांची समजूत काढत त्यांना सक्रिय करून घेण्यात चव्हाण यांना यश आले आहे. यामुळेच त्यांनी भाजपचा गड कायम राखत बागडे नानांचा उत्तराधिकारी होण्याचा बहुमान पटकावल्याची चर्चा आहे.