वसमत / हिंगोली – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकीकडे उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे बीएलओ अधिकारी मतदान यादी हातात घेऊन घराघरात सर्वेक्षण करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अजूनही मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये एकाच घरातील सदस्यांची नावे तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये दाखल झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
या गंभीर चुकांमुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी असून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही सर्व एकाच घरात राहतो, तरी आमची नावे वेगवेगळ्या प्रभागांत दाखवली गेली आहेत. मतदानाच्या दिवशी आम्ही मतदान करणार कुठे?”
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदार यादी अंतिम होण्यापूर्वी सर्व तपासणी पूर्ण व्हायला हवी होती. मात्र, प्रत्यक्षात बीएलओ अधिकारी अजूनही घराघर तपासणी करत आहेत. यावरून प्रशासनाची निष्काळजीपणा स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक नागरिकांनी निवडणूक अधिकारी व प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. “जर मतदार यादीच अचूक नसेल, तर निवडणुकीचा निकाल किती पारदर्शक राहणार?” असा प्रश्न शहरातील राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती, मात्र प्रत्यक्षात अजूनही बीएलओ घराघर जाऊन तपासणी करत असल्याने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी नागरिकांकडे मतदान पत्र नसल्याची तक्रार येत आहे, तर काहींचे नावे यादीतून दुसऱ्या प्रभागामध्ये गेल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांनी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू केली असली तरी मतदारांची नावेच निश्चित नसल्याने निवडणूक पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “एकीकडे उमेदवार अर्ज भरत आहेत आणि दुसरीकडे बीएलओ यादी तपासत आहेत, मग हे नियोजन कुठे आहे?” या दुर्व्यवस्थेबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिक व उमेदवारांकडून जोर धरत आहे.

















