अकलूज – देव, देशआणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास आज फाल्गुन अमावस्येला (१८ मार्च २०२६) संपन्न झाला. या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, माळशिरस तालुका व अकलूज विभागाच्या वतीने अकलूज शहरात सायंकाळी ६ वाजता भव्य ‘मूकपद यात्रा’ काढण्यात आली. शेकडो धारकरी, शिवभक्त, स्वयंसेवक आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत निघालेल्या या यात्रेने संपूर्ण अकलूज शहर शंभूराजांच्या स्मृतीने भारावून गेले होते.”
*
विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू झालेला हा बलिदान मास १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान पाळला गेला. शंभूराजांच्या बलिदानाचा विसर पडू नये आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही ‘मूकपद यात्रा’ आयोजित केली जाते. अकलूजमधील विजय चौक येथून या मूकपद यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा शिवापूर पेठ, आझाद चौक, गांधी चौक मार्गे जात जय शंकर उद्यान येथे पोहोचली.इंडियन आर्मीचे जवान मेजर कृष्णा आदमिले यांनी परम पवित्र भगवा ध्वज घेऊन पवित्रा घेतला त्या पाठोपाठ धर्मवीर ज्वाला तसेच मूकपद यात्रेचे संदेश देणारे पोस्टर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची सात फुटाची मूर्ती आणि त्या पाठोपाठ सर्व धारकरी स्वयंसेवक धर्मबंधू शिवभक्त व माता -भगिनी यांनी मौन धारण करून या मूकपद यात्रेत सहभाग नोंदवला. औरंगजेबाने शंभूराजांचे जे हाल केले, त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा निघू शकली नव्हती. तीच उणीव भरून काढण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही मूक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
त्यागाची आणि निष्ठेची भावना
या ३० दिवसांच्या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि शिवभक्त अत्यंत कडक नियम पाळतात. कुणी अन्न-पाण्याचा त्याग करतो, कुणी मुंडन करतो, तर कुणी महिनाभर पायात पादत्राणे घालत नाही. केवळ शंभूराजांनी धर्मासाठी सोसलेल्या अनन्वित छळाची जाणीव म्हणून हा शोक पाळला जातो. देशाच्या सीमेवरील जवान देखील हा बलिदान मास पाळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुकपदयात्रेचा शेवट जयशंकर उद्यान येथे झाला. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीकात्मक चितेला ‘धर्मवीर ज्वाले’तून अग्नी समर्पित करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मरक्षणाची, राष्ट्ररक्षणाची शपथ घेतली.धारकऱ्यांनी शंभूराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिल
यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सुधीर पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. त्यांनी गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा नेमका संदर्भ काय, याबद्दलचे गैरसमज दूर केले. फाल्गुन अमावस्येनंतर येणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षाचा सण कशा प्रकारे उत्साहात साजरा करावा, हे त्यांनी पटवून दिले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे, अकलूज विभाग प्रमुख दीपक चिंतामणी, सुधीर पवार, बलिदान मास प्रमुख वैभव वडतीले, आकाश वायकर, सागर व्यवहारे, दीपक भिसे, रणजितदादा गायकवाड,अर्जुन इंगोले,तुषार सूर्यवंशी श्री शिवाजीराव घोडके युवराज वाळके अक्षय चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थित धारकऱ्यांनी शंभूराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.























