सोलापूर – आगामी काळात रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेती यामूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यावर भर राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली.शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध कर्मचारी संघटना तसेच जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सांगितले की, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच शेतीचे प्रश्नही गंभीर आहेत. “शेतकरी जगला तरच आपण सर्व जगू,” ही भावना मनात ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूर यामुळे पिकांचे नुकसान होते. त्यातच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढतात. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेतरस्त्यांची समस्या गंभीर असल्याचे अधोरेखित केले. अनेक ठिकाणी रस्त्यांचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकवलेला माल बाजारात नेणे कठीण जाते. काही ठिकाणी रस्त्यांबाबतचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रकरणे सामोपचाराने सोडवून शेतरस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट
जनतेसाठी अनोखे आवाहन “हार-तुरे नकोत; उपयोगी भेटवस्तू द्या”
नागरिकांनी आणि हितचिंतकांनी सत्कार करताना हार-तुरे किंवा पुष्पगुच्छ न आणता शेतकऱ्यांसाठी शेती अवजारे तसेच विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, कंपास, शाळेच्या बॅगा आदी शैक्षणिक साहित्य आणावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले.
यामुळे गरजू आणि वंचित घटकांना थेट मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
अध्यक्षांना भेटण्यासाठी अभ्यागतांची मोठी गर्दी कार्यालयात झाली होती. यावेळी आलेल्या अभ्यागतांना नेमके काय बोलायचे? याबाबत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी अध्यक्षांच्या कानात सांगितल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. अध्यक्षांना उपाध्यक्षांनी दिला कानमंत्र अशी चर्चा यावेळी ऐकण्यास मिळाली.
























