टेंभुर्णी – धरणग्रस्तांच्या जमिनी सरकार उजनी पर्यटनासाठी आदी ग्रहण करणार असेल तर, सर्व धरणग्रस्त शेतकरी विरोध करणार असल्याचे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. माढा तालुक्यातील सुरली येथे धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला होता.
या मेळाव्यात प्रा पाटील म्हणाले,उजनी धरण पूर्ण क्षमतेने १००% भरल्यानंतर शिल्लक जमिनी पूर्वजांपासून आजच्या पिढीपर्यंत शेतकरी कसत आहेत. परंतु त्या जमिनीवर उजनी धरण संपादित अशा महसूल नोंदी आहेत.या जमिनी धरणग्रस्तांना परत मिळाव्यात यासाठी सातत्याने शेतकरी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. असे असताना उजनी पर्यटनासाठी सरकार संपादित जमिनी शेतकऱ्यांकडून अधिग्रहण करण्याच्या विचारात आहे.
मौजे सुरली येथील ७०० एकर जमीन उजनी धरणासाठी संपादित झालेली आहे.त्यापैकी १५० ते २०० एकर जमिनीवर पाणी येत नसल्याने पूर्वांपार शेतकरी जमिन कसत आहे. परंतु शासन जर या जमिनी हिसकावून घेत असेल तर आम्ही धरणग्रस्त शेतकरी एकत्रित येऊन विरोध करणार करणार असल्याचे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.
यावेळी उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर,माढा तालुका धरणग्रस्त संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब ढेकणे, नीलकंठ शिंदे,संपत काळे,प्रताप काळे, रामकृष्ण काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
माजी सरपंच रामकृष्ण काळे यांनी सुरली येथील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांची नावांची यादी वाचून दाखवत,त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व ग्रामस्थ उभा राहणार असल्याचे ठणकावून सांगितले.यावेळी गणेश मुळे,सागर भोपे,भद्रसेन पाटील, संपत काळे,शांतीलाल मुळे,कुबेर कदम, हरिदास कदम,रवींद्र जाधव,अशोक जाधव, विठ्ठल जाधव,आप्पा कदम,केशव सरडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

























