जालना – शहरातील ऑटो रिक्षा चालक – मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, संयुक्त कृती समिती महाराष्ट्र (शाखा : जालना) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
एलपीजी गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने आणि रिक्षा व्यवसाय गंभीर अडचणीत आल्याने मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेमुदत रिक्षा बंद व चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशातील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात एलपीजी गॅस पंपांवर चालकांकडून मनमानी दर आकारले जात आहेत, तसेच गॅसचा पुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम ऑटो रिक्षा चालकांच्या रोजीरोटीवर होत असून अनेक चालकांवर उपजीविकेचे संकट ओढवले आहे.
रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की, आधीच वाढती महागाई, इंधन खर्च, दैनंदिन देखभाल आणि उत्पन्नातील घट यामुळे चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच एलपीजी गॅस मिळण्यात होणारा विलंब आणि दरांबाबतचा गोंधळ यामुळे शहरातील रिक्षा वाहतूक विस्कळीत होत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांची प्रवास व्यवस्था देखील बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, संघटनेने शहरात विनापरवाना ई-रिक्षांची वाढती संख्या हा देखील गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. अशा अनधिकृत वाहनांमुळे नियमित परवाना धारक रिक्षा चालकांचा व्यवसाय मंदावला असून, अधिकृत रिक्षा चालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या निवेदनावर चालक-मालक संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी सचिव सुभाष चव्हाण उपाध्यक्ष संतोष शेळके कमलेश काथवटे सय्यद रहीम गणेश मस्के दत्तात्रेय शिकारे संजय भालेराव शेख गफ्पर शेख शेख आयुब गणेश चौधरी प्रकाश चव्हाण यौसेफ जगधणे राम पंडितराव मस्के विशाल घुमरे अनिल घडलिगे आदींच्या साक्षर आहेत



















