सोलापूर – दहा महिन्यापासून बदली होऊनही मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांचा रखडलेला पदभार कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सोमवारी ग्रामसेवक जोडमोटे यांना पदभार सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दहा महिन्यापासून ‘दैनिक तरुण भारत’ने पाठपुरावा केलेल्या बातमीला यश मिळाल्याचे दिसून येते.
जून महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील ८४ ग्रामसेवकांची बदली केली होती. यावेळी मंद्रूपचे प्रभारी ग्रामसेवक नागेश जोडमोडे यांचीही बदली झाली असताना ते राजकीय दबाव आणून पदभार देण्यास तयार नव्हते. बदली झालेले ग्रामसेवक कुशाबा इंगळे दोन वेळा पदभार घेण्यासाठी मंद्रूपला आले असतानाही ग्रामपंचायत सदस्यांनी पदभार न देताच त्यांना परत पाठवले होते . दक्षिणचे बीडीओ मनोज राऊत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सोमवारी सहा एप्रिल रोजी नागेश जोडमोटे यांचे पदभार काढून कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकारी युसुफ पठाण यांनी उपस्थित राहून पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडले .
…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांची बदली केली होती. मात्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांमुळे पदभार प्रक्रिया प्रलंबित होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला होता . मात्र हस्तांतर रखडले होते. त्यामुळे सोमवारी सहा एप्रिल रोजी विस्तार अधिकाऱ्यांच्या समक्ष दोन्ही ग्रामसेवकांचे पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडली आहे .
….
दैनिक तरुण भारत च्या पाठपुरावाला यश
…
जून महिन्यापासून ग्रामसेवक जोडमोटे पदभार देण्यास टाळाटाळ करीत होते. राजकीय दबाव आणून पदभार देण्याचे टाळत होते . शिवाय अधिकाऱ्यांवरही दबाव असल्यामुळे पदभार प्रक्रिया रखडली होती. याबाबत ‘दैनिक तरुण भारत’ने वारंवार बातमी प्रकाशित करून मंद्रूपच्या ग्रामसेवकाला पदभार देण्यास भाग पाडले . त्यामुळे दैनिक तरुण भारतच्या वृत्ताला यश आल्याचे दिसून येते. मंद्रूपच्या विकासासाठी दैनिक तरुण भारतने केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.
…..
पारदर्शक कारभार व्हावे
….
ग्रामसेवक जोडमोटे हे स्थानिक असल्यामुळे मनमानी कारभार करीत होते. निंबर्गी सजा असल्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात क्वचितच दिसत होते. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारामध्ये अस्ताव्यस्तपणा आला आहे. शिवाय कामकाजाविषयीही नाराजी आहे. म्हणून ग्रामसेवक इंगळे यांनी पारदर्शक कारभार करून मंद्रूपच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



















