सोलापूर – “केवळ पदवी नव्हे, तर संस्कारांची जडणघडण हेच खऱ्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे,” असा मर्मस्पर्शी संदेश देत परमपूज्य मुनीश्री वीरसागरजी महाराज यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा दीप दिला. शिक्षण आणि संस्कार यांचा संगम साधणारी ही भूमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सोलापूरातील डब्ल्यू.आय.टी. कॅम्पस परिसर आज अध्यात्म, संस्कार आणि भक्तिभावाने भारावून गेला होता. परमपूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य मुनीश्री वीरसागरजी महाराज ससंघ यांचे आगमन वाद्यांच्या निनादात आणि जयघोषांच्या गजरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या मुनिसंघात मुनीश्री विशालसागरजी महाराज, धवलसागरजी महाराज, मंथनसागरजी महाराज, मननसागरजी महाराज, विरलसागरजी महाराज तसेच क्षुल्लकश्री विजितजी महाराज यांचा समावेश होता.
वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात आगमनानंतर मुनीश्रींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात केवळ उपलब्धी (निर्माण) महत्त्वाची नाही, तर आत्मिक समाधान (निर्वाण) साधणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यासाठी गुरुभक्ती, त्याग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.
डब्ल्यू.आय.टी. कॅम्पसचे पावित्र्य, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांचे शुद्ध आचरण पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी येथे जैन मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी समर्पणभाव ठेवून जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी धर्मपत्नी सौ. माया गांधी यांच्यासह पंचरंगी ध्वज फडकावून मुनीश्रींना अर्घ्य अर्पण केले. योगायोगाने डॉ. गांधी यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छाही देण्यात आल्या.
मुनीश्री धवलसागरजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात वालचंद शिक्षण समूहाच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेच्या बीजारोपणातून सुरू झालेला हा प्रवास आज संस्कारक्षम शिक्षणसंस्थेच्या रूपाने देशभरात नावारूपाला आला आहे. विविध राज्यांतील जैन विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माहितीची कमतरता नसली, तरी हृदय आणि मेंदू यातील अंतर कमी करण्यासाठी नैतिक व भावनिक विकास अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांच्या उपदेशानुसार आचरण केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भक्ताम्बर विधानाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आचार्य मानतुंग यांनी रचलेल्या ४८ कडव्यांमधून जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. भक्ताम्बर उपासनेमुळे मानसिक तणाव कमी होऊन आत्मिक शांती लाभते. “भक्ताम्बरची उपासना करा, धर्म वृद्धिंगत करा आणि आपले घर स्वर्ग बनवा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, कुटुंबाच्या उन्नतीत स्त्रियांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासोबत त्यांच्या सुरक्षेला आणि संस्कारांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या समारोपात त्यांनी अधोरेखित केले की, “उत्तम चारित्र्य, शुद्ध विचार आणि योग्य कृती यांवरच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन उभे राहते.” वालचंद परिसरात शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना होत असल्याने येथे घडणारे विद्यार्थी निश्चितच समाजाचे आदर्श नागरिक ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






















