सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ‘दावल मल्लिक बाबा पीर’ परिसरातील राखीव वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण वन विभागाने पोलीस बंदोबस्तात यशस्वीरित्या हटवले आहे. ही कारवाई बुधवारी, ६ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजल्यापासून राबविण्यात आली.
नेमके प्रकरण काय?
बोरामणी येथील गट नं. ७६९ (जुना सर्व्हे नं. ३३८, क्षेत्र १५०.९१ हे.) ही जमीन भारतीय वन अधिनियम १८७८ नुसार १८८४ मध्येच ‘राखीव वन’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जमिनीवर जून २०२५ मध्ये पत्राशेड, टपऱ्या, पक्की बांधकामे आणि पाण्याच्या टाक्या असे अनधिकृत अतिक्रमण निदर्शनास आले होते.
वनरक्षक गंगाधर कणबस यांनी याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांनुसार वनगुन्हा (क्र. IN-01/2025) दाखल केला होता. या अतिक्रमणाबाबत विधिमंडळाच्या २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.
कायदेशीर प्रक्रिया आणि नोटीस
या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) सोलापूर यांनी १५ अतिक्रमणधारकांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांच्या वतीने दावल मलिक दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली, मात्र त्यांना जमिनीवर हक्क सांगणारा कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही. अखेर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सहाय्यक वनसंरक्षकांनी हे अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले होते.
अशी झाली कारवाई
पुण्याचे वनसंरक्षक (प्रा.) आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे आणि विविध तालुक्यांचे वनपरिक्षेत्र अधिकारी सहभागी होते.
या पथकाने अतिक्रमण हटवले
आर. ए. गांगर्डे (सोलापूर), आर. एस. आटोळे (माळशिरस), योगेश घोडके (मोहोळ), एस. व्ही. मगर (सांगोला), एस. बी. चाटे (पंढरपूर), ए. एन. करे (बार्शी)
मोठ्या पोलीस ताफ्यासह वन कर्मचारी आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मिळून अनधिकृत पक्की बांधकामे आणि शेड्स जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे वन जमिनी बळकावणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

























