अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…..
मंगळवेढा – ब्रम्हपुरी येथे भारत गॅस एजन्सी आवारातून 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 450 किलो वजनाचे 2 एलपीजी गॅस सिलेंडर व 5 लाखाचे महिंद्रा कंपनीचे पिकअप चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी आनंद तानाजी पाटील यांचे ब्रम्हपुरी येथे गॅस एजन्सी दुकान असून दि.22 मे रोजी गॅस विक्री करता आवश्यकता असल्याने भारत पेट्रोलियम कंपनी लि.,सोलापूर येथून एलपीजी गॅसचे दोन नग प्रत्येकी 450 किलो वजनाचे सिलेंडर मागणी केली होती. सदरचे सिलेंडर हे महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम.एच.13 ई.पी.1074 मध्येच ठेवले होते. सदरचे वाहन गॅस कंपनीचे समोर पार्कींग करण्यात आले होते. रविवारी सुट्टी असल्याने गॅस एजन्सी बंद होती. सोमवार दि.25 मे रोजी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे फिर्यादी हे दुकान उघडण्याकरिता आल्यावर एजन्सीच्या समोर पार्किंग करण्यात आलेली पिकअप गाडी व दोन सिलेंडर गॅस दिसून आले नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नसल्यामुळे कोणी तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून चोरुन नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान सध्या गेल्या अनेक महिन्यापासून युध्द सुरु असल्यामुळे घरगुती गॅस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात गॅसला पर्याय म्हणून चुलीही पेटू लागल्या आहेत. येथे चक्क चोरट्याने गॅस पळवून नेल्यामुळे या परिसरात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे
नववधूने सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून केला पोबारा
शिक्षकासह अन्य तिघा विरुध्द गुन्हा दाखल…..
मंगळवेढा – बावची येथे एका नवविवाहित तरुणीने तीन महिने संसार करुन रोख रक्कम व सोन्याचे दागीने घेवून निघून गेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अश्विनी मारुती दानोळे (रा.देवरुख जि.रत्नागिरी) युवराज कांबळे,पिंटू उर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर (सर्व रा.रड्डे) यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात अर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी नामदेव सुखदेव जाधव (रा.बावची,वय 38) याचे लग्न अश्विनी हिचे सोबत जमविण्याकरिता 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेवून 3 महिने संसार करुन दि.22 फेबु्रवारी 2026 घरातून फिर्यादीच्या आईचे दीड तोडा वजनाचे गंठण,रोख तीन हजार रुपये घेवून तिच्या गावी देवरुख जि.रत्नागिरी येथे निघून गेली आहे. दरम्यान अश्विनीचे पुर्वी लग्न झालेे असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी असल्याचे माहित असताना देखील लग्न जमविणारे पिंटू उर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर,युवराज कांबळे गुरुजी आदींनी फिर्यादी सोबत लग्न लावून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.





















