
सोलापूर – सोलापूर येथे 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम केले. जवळपास या तीन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे हाताळण्यात आली. येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून हाती घेतलेली जवळपास सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. तसेच 3 एप्रिल 2026 रोजी माझी बदली नागपूर येथे झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी माझ्या मनात आहे व राहील, असे भावनिक उद्गार तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी काढले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्या निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात त आयोजित करण्यात आलेला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संतोषकुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सुमित शिंदे, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकार कर्मचारी तसेच प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी पदाची यशस्वी कारकीर्द ही येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असते. नव्याने रुजू झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यातच कोणत्या अधिकाऱ्याकडून कोणत्या प्रकारची
कामे करून घेता येतील याची माहिती होणे गरजेचे असते. तसेच वेळप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना रजाही देणे आवश्यक असते. परंतु जिल्हाधिकारी यांनी कठोर असणे आवश्यक आहे. कारण जिल्हाधिकारी कठोर राहिले तर प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी अधिक गतीने कामे करतात व त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लवकर मिळण्यात होऊन शासन व प्रशासनाची चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
महसूल प्रशासनाबरोबरच इतर विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट सहकार्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे मार्गी लावण्यात यशस्वी झालो असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर येथील विमान सेवा सुरू करणे, आषाढी वारीचे यशस्वी आयोजन, पूर परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज तसेच प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, यामुळे येथे आपण काहीतरी सर्वसामान्यांसाठी काम करू शकलो याचे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूर येथे बदली झाली असली तरी सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी आपण सांगितले तर ते काम करण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी एस कार्तिकेयान यावेळी म्हणाले की, मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी म्हणून आपण सोलापूर मध्ये काम करत असून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथे जी प्रशासकीय कामकाजाची चौकट निर्माण केली आहे, त्यामुळे कामे करताना कोणतीही अडचण येत नाही. येथील सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पडतात. तसेच श्री आशीर्वाद सरांनी जे आपले अनुभव मला सांगितलेले आहेत त्या पद्धतीने कामकाज करून सोलापूर जिल्हा विविध विकासकामात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी की कुशल जैन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाचे व कार्यपद्धतीचे कौतुक केले.
सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कारभारात तीन वर्षे कुशल नेतृत्व व मार्गदर्शन देणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा निरोप समारंभ सोमवारी सायंकाळी पार पडला. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. यामध्ये तहसीलदार मदन जाधव यांनी प्रशासकीय अनुभव शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाज सुलभ झाल्याचे सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रास्ताविक करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा केली.जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. महत्वाच्या निर्णयांची माहिती देत त्यांनी कुशल नेतृत्व अधोरेखित केले.उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर व उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. महसूल संघटनेचे पदाधिकारी शंतनू गायकवाड रविराज नसते यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच सर्व संघटनाचे पदाधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन. समारंभात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर तहसील चे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले तर आभार अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




















