सोलापूर – अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवघ्या आठ दिवसांत राज्यभर धडक कारवायांची मालिका राबवत भेसळ आणि बेकायदा अन्नव्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे भेसळमाफियांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमधून या मोहिमेचे स्वागत होत आहे.
राज्यातील गुटखा व पानमसाला विक्री, भेसळयुक्त दूध व तूप, रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली फळे, अस्वच्छ खाद्य उत्पादन केंद्रे, बनावट औषधनिर्मिती तसेच दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान ३३ जणांना अटक करण्यात आली असून २७ आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २५ गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपयांचा संशयित व भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर विभागानेही दूध भेसळीविरोधातील मोहिमेला गती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १३ दुधाचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या कारवायांमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. भेसळ रोखण्यासाठी केवळ छापेच नव्हे, तर सातत्यपूर्ण तपासणी, प्रयोगशाळा विश्लेषण आणि दोषींवर कठोर कारवाई ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, अल्पावधीत झालेल्या मोठ्या कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेत चर्चा रंगली आहे. ग्राहक संरक्षणाशी संबंधित संघटनांनीही भेसळविरोधातील मोहिमेचे स्वागत करत अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवायांची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात सुरक्षित अन्नपदार्थ आणि निर्भेळ दूध पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम भविष्यात आणखी व्यापक स्वरूप धारण करणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून दिले जात आहेत.
Post Views: 15