नंदेश्वर गावालगत तसेच नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत असलेली एक जुनी विहीर सध्या ग्रामस्थांसाठी मोठा धोक्याचा विषय ठरत आहे. ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला असून तिच्या आसपास कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच नंदेश्वर गावातील श्री बाळकृष्ण विद्यालय असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू असून, विहिरीच्या अगदी कडेलाच रस्ता विकसित केला जात आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी या धोकादायक विहिरीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
अलीकडेच तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत बुडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात रस्ता बांधकामादरम्यान ठेकेदाराने पुरेशी सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अशा धोकादायक विहिरींकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर येथील विहिरीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विहिरीच्या एका बाजूला रस्ता असून दुसर्या बाजूला नंदेश्वर येथील बौद्ध बांधवांनी उभारलेले बुद्ध विहार आहे. येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवेळी लहान मुलांची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे या विहिरीमुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावालगतच वस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या विहिरीचा सध्या गावाला कोणताही उपयोग नसून केवळ सुरक्षा कठडा किंवा भिंत बांधून हा प्रश्न सुटणार नाही. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी ही विहीर पूर्णपणे बुजविणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन व संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात आणि रस्ता पूर्ण होण्यापूर्वी या विहिरीचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे संपूर्ण नंदेश्वर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चौकट–
याआधी टळली होती मोठी दुर्घटना
विशेष म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी नंदेश्वरहून मंगळवेढाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस या विहिरीत कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली होती. त्या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी हा प्रकार ग्रामस्थांच्या स्मरणात आजही ताजा आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















