सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी “Simulation of BMS Using MATLAB Simulink” हा अभिनव व संशोधनाधारित प्रकल्प यशस्वीपणे विकसित केला आहे. ऊर्जा व्यवस्थापन आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकल्पामध्ये आधुनिक Battery Management System (BMS) चे MATLAB Simulink या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संगणकीय अनुकरण (Simulation) करण्यात आले आहे. बॅटरीचे व्होल्टेज, करंट, स्टेट ऑफ चार्ज (SOC), स्टेट ऑफ हेल्थ (SOH), सेल बॅलन्सिंग तसेच ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज आणि ओव्हर करंट यांसारख्या सुरक्षात्मक बाबींचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी प्रभावी मॉडेल विकसित करण्यात आले आहे.
हा प्रकल्प इलेक्ट्रिक वाहने (EV), सौर ऊर्जा संचयन प्रणाली, UPS आणि पोर्टेबल बॅटरी पॅक यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या मॉडेलमुळे बॅटरीची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि आयुष्य वाढविण्यास मदत होणार असून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे बॅटरीमधील दोष ओळखणे, तापमान नियंत्रण, ऊर्जा व्यवस्थापन आणि सेल बॅलन्सिंग यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे सखोल अध्ययन करण्यात आले आहे.
प्रकल्प सादरीकरणावेळी विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक करताना, अशा प्रकारचे प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांमध्ये हा प्रकल्प विशेष ठसा उमटवेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
हा प्रकल्प खालील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे :
- श्री. सलमान इलियास अहमद शेख (EE-325)
- श्री. सुशांत प्रभाकर पवार (EE-335)
- श्री. रोहन सतीश चालवडी (EE-319)
- श्री. सुफियान वसीमरजा तंगसाळ (EE-341)
या प्रकल्पाला विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्री. म्हांता आर. पी. यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगाभिमुख आणि भविष्यकालीन गरजांना पूरक असा प्रकल्प विकसित केला.
संस्थेचे अध्य्क्ष मा. श्री. एस. ए. पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चोगुले, उपप्राचार्य श्री. एस. के. मोहिते, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक करताना, अशा प्रकारचे प्रकल्प हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारे असल्याचे मत व्यक्त केले. राज्यस्तरीय तांत्रिक प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धांमध्ये या प्रकल्पाला विशेष यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




















