सोलापूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस.आर.पी. कॅम्प, सोलापूर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध उत्साही आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत श्रीधर सिद्धाराम डोंगरीतोट आणि कार्तिक महेश ईपोळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वीरपाक्षी स्वामी हे होते, तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका माळी, ठाकूर जाधव, पोपटराव माने, तुषार टोणपे, जमादार, दळवी आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले.
वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करून राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उपक्रमशील शिक्षिका सारिका राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले. एस.आर.पी.एफ. ग्रुप नंबर १० चे समादेशक डॉ. दिपाली काळे यांनी परेड मैदानावरील ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर बाळासाहेब खटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक संगीतमय कवायत प्रकार सादर केले. तसेच, अंगणवाडी आदर्श बालकमंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने मने जिंकली, ज्यासाठी त्यांना राजश्री करकंटी, सोनाली भोसले आणि श्वेता उंबरजे यांचे मार्गदर्शन लाभले. राखी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व प्रेरणादायी भाषणे सादर केली. शाळेतील हुशार विद्यार्थी सचिन अनिल जाधव आणि टायगर मठपती यांनी टाकाऊ साहित्यापासून भरधाव वेगात धावणारी मोटारकार आणि सौरऊर्जेवर चालणारा स्वयंचलित पंखा तयार करून त्याचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पुंडलिक लक्ष्मण कलखांबकर यांनी केले. श्रीशैल समदूरले यांनी आभार मानले.
























