सोलापूर : राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बाळे येथील राजेश्वरी नगर परिसरातील एन. के. किड्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या शाळेच्या परिसरातील वृक्षांना बांधत राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी केली.
राखी पौर्णिमा म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. “वृक्ष आहेत तर जीवन आहे; त्यामुळे वृक्षांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असा पर्यावरणपूरक संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी क्राफ्ट पेपरचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व आकर्षक राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या होत्या. त्यानंतर या राख्या शाळेच्या परिसरातील वृक्षांना बांधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. वृक्षांनाही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपले पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, शिक्षिका पूनम कळसाईत, प्राजक्ता भस्मे, रोहिणी आदलिंगे, तसेच सेविका संगीता हेगडकर आणि शिंदे मावशी उपस्थित होत्या. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
राखीच्या पवित्र धाग्याने वृक्षांशी नाते जोडत, “झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश देणारा एन. के. किड्स स्कूलचा हा उपक्रम उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.





















