जालना – स्व. गजानन तौर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. गजानन तौर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५०९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे.

१७ जुलै रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिकांची उपस्थिती लाभली. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्याणी तौर यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून स्व. गजानन तौर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
यंदा रक्तदानासाठी युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने रक्तसंकलनाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली होती. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यासाठी सहा रक्तपेढ्यांच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री स्वामी समर्थ रक्तसंकलन केंद्र, वरद रक्तसंकलन केंद्र (धुळे), जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, बदनापूर रक्तपेढी, नूर हॉस्पिटल बदनापूर आणि राज्य रक्त संक्रमण केंद्र यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.
शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याचा झाड देऊन सन्मान करण्यात आला. युवक, महिला तसेच प्रथमच रक्तदान करणाऱ्या तरुणांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी नियमित रक्तदानाचा संकल्पही केला.
अभिवादन कार्यक्रमाला नगरसेवक महावीर ढक्का, सभापती संध्या देठे, अक्षय गोरंट्याल, गट नेते महेश निकम,नगरसेवक दिनेश भगत ,सभापती सुजित जोगस, मनोज इंगळे, महेश दुसाने, महेश नळगे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योगपती, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. गजानन तौर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिरासह आरोग्य, शिक्षण, सामाजिक जनजागृती आणि जनहिताचे विविध उपक्रम राबविले जातात. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सेवाभावी कार्यातून त्यांची आठवण जिवंत ठेवण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न असल्याचे कल्याणी तौर यांनी सांगितले.
आमदार हिकमत उढाण म्हणाले की, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. स्व. गजानन तौर फाऊंडेशनने स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. ५०९ जणांनी केलेले रक्तदान ही केवळ संख्या नसून समाजातील सेवाभाव आणि मानवतेची जाणीव अधोरेखित करणारी बाब आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढी सामाजिक कार्याकडे प्रेरित होत आहे.
आमदार नारायण कुचे म्हणाले की, स्व. गजानन तौर यांनी समाजसेवेचा जो विचार जपला, तो फाऊंडेशन आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात शेकडो युवकांचा सहभाग ही आनंदाची बाब आहे. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. अशा सेवाभावी उपक्रमांना भविष्यातही माझे पूर्ण सहकार्य राहील, असे ते म्हणाले.





















