धाराशिव – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून सीबीआय विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
निकाल देताना न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने नमूद केले की, संपूर्ण खटला माफीच्या साक्षीदार पारसमल जैन यांच्या साक्षीवर उभा होता. मात्र त्यांच्या जबाबांमध्ये वारंवार विसंगती, बदल आणि तफावत आढळून आल्याने त्यांची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही. त्यामुळे सरकारी पक्षाचा खटला कमकुवत ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने तपासातील अनेक त्रुटींचाही उल्लेख केला. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले नाहीत, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) गोळा करण्यात आले नाहीत, तसेच आरोपी परस्पर संपर्कात होते का याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनास्थळ, वाहनाचा रंग, आरोपींच्या हालचाली आणि पैशांच्या व्यवहारांबाबतही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आढळून आली.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद आणि वैमनस्य होते, हे पुराव्यांवरून दिसून येते. पवनराजे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही प्रशासनाकडे केली होती. मात्र केवळ राजकीय वैमनस्य असल्याने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवता येत नाही. त्यासाठी ठोस, सुसंगत आणि कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावे आवश्यक असतात.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने असेही नमूद केले की, २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देणे ही दुर्दैवी बाब आहे. एका लोकनेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाली, मात्र तपासातील त्रुटींमुळे दोष निश्चित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे संशयाचा फायदा देत सर्व आरोपींना मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
३ जून २००६ रोजी मुंबईहून पुण्याकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवनराजे निंबाळकर यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास कळंबोली पोलीस, नवी मुंबई गुन्हे शाखा आणि अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
तब्बल दोन दशकांच्या कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा निकाल निंबाळकर कुटुंबीयांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
चौकट
दुर्दैवी निकाल ; उच्च न्यायालयात दाद मागणार – खासदार ओमराजे निंबाळकर
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा निकाल न्यायव्यवस्थेचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया देत पुढील लढाई उच्च न्यायालयात लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “या खटल्याच्या निकालासाठी तब्बल 20 वर्षांचा कालावधी लागला. एवढ्या प्रदीर्घ सुनावणीनंतर असा निर्णय येत असेल, यापेक्षा न्यायव्यवस्थेचे मोठे दुर्दैव असू शकत नाही,” असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. सुरुवातीच्या पोलिस तपासावर दबाव असल्यामुळेच आम्ही उच्च न्यायालयात जाऊन तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. सीबीआयने तपास केला, मात्र त्यामध्येही मोठा कालावधी गेला. आता वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पवनराजे यांची हत्या झाली, ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाने राजकीय वैमनस्य असल्याचेही मान्य केले आहे. मग पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी न्यायासाठी पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले.
Post Views: 26