सोलापूर – जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या परीक्षेला मुंबई आणि नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने नियुक्ती प्रक्रियेबाबत शिक्षकांसह शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
राज्यभरातील केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत काही परीक्षार्थींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून न देणे, उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्याची संधी न देणे, तसेच विविध शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्याने समानतेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन स्तरावर भरती व पदोन्नती प्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच पुढील प्रशासकीय प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही संबंधित सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय बाब नसून शालेय शिक्षण व्यवस्थेच्या नेतृत्वाशी निगडित असल्याने न्यायालयीन निर्णयानंतर या प्रक्रियेची दिशा आणि परिणाम अधिक स्पष्ट होणार आहेत.
चौकट
काही जिल्हा परिषदांमध्ये विभागीय परीक्षेत यशस्वी ठरलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख पदाचे नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन सुनावणी आणि नियुक्ती प्रक्रिया यांचा समांतर प्रवास सुरू असल्याने या विषयाकडे राज्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
कोट
सदर भरती प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पार पाडत आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया बाबत शासन स्तरावरती सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही खोडसळ परीक्षार्थी या भरती प्रकरणात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. हा विषय सध्यातरी न्यायप्रविष्ठ असल्याचे मत केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांनी व्यक्त केले आहे.