सोलापूर : आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात टाळ-मृदुंगाच्या गजरात, “गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. रूपा भवानी चौक येथे पालखीचे आगमन होताच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
यावेळी उपमाहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे,पोलीस आयुक्त एम राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगु. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर,पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर उपायुक्त सोनाली यादव,नगरसेवक संजय कोळी,नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेविका राजश्री दोडमनी , नगरसेविका श्वेता खरात, माजी नगरसेवक लता फुटाणे, ॲड. विजय मराठे तसेच भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, १८ व १९ जुलै रोजी सोलापूर शहरात संत श्री गजानन महाराज पालखीचा मुक्काम असून सुमारे ७०० वारकरी या पालखीसोबत सहभागी होत आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत २४ तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली असून संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
पालखीच्या मुक्कामासाठी कुचन प्रशाला तसेच उपलब्ध मंगल कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व कामांसाठी महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.”संत श्री गजानन महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे.
यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेचे सर्व अधिकारी,कर्मचारी अहोरात्र कार्यरत
सोलापूर शहरात आगमन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण मिळावे, ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, मुक्कामाची सोय तसेच आपत्कालीन सेवांची २४ तास उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. वारकरी हे आपल्या शहराचे मानाचे पाहुणे आहेत. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. संतांच्या आशीर्वादाने आषाढी वारीचा हा सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास महापौर कोंड्याल यांनी व्यक्त केला.
—-
Post Views: 8