कळंब – नगर पालिकेतील उबाठा गटाचे नऊ आणि काँग्रेसचा एका अशा एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोलापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धाराशिवचे संपर्कमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीन काळे,सुरेशभाऊ देशमुख,नितीन भोसले,सतीश दंडनाईक,उपाध्यक्ष लखन गायकवाड, भाजप गटनेते हर्षद अंबुरे व भाजपाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. या सर्व नगरसेवकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपसोबत जात असल्याचे जाहीर केले आहे.
कळंब शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणणे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे, हा या भूमिकेमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेले विकासाचे पर्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबविल्या जात असलेल्या विविध विकासकामांमुळे प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे गटनेते संजय मुंदडा यांनी यावेळी बोलताना सांगितले. या पक्षप्रवेशामुळे कळंबसह धाराशिव जिल्ह्यात भाजपाचे वाढते राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपच्या विकासाच्या भूमिकेशी जोडले जात असल्याने जिल्ह्यातील भाजपा नेतृत्वावरील विश्वास वाढत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, उबाठा गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना उबाठासमोर कळंबमध्ये आपले राजकीय अस्तित्व आणि संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. कळंबच्या विकासाला सक्षम नेतृत्वाची साथ आणि भाजपच्या वाढत्या संघटनशक्तीला मिळणारा लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद, यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. यावेळी कळंब नगर पालिकेतील गटनेते संजय मुंदडा यांच्यासह नगरसेवक सागर मुंडे, सफूरा शकील काझी, जमील महंमद खाटीक, इंदुमती जयनंदन हौसलमल, रुखसाना चांदसाब बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशा सुधीर भंवर, ज्योती दीपक हारकर व काँग्रेसच्या अर्चना प्रताप मोरे आदींनी गुरुवारी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. कळंब नगरपालिकेत भाजपचे ६ सदस्य निवडून आले आहेत. शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि ४ सदस्य आहेत. तर ठाकरे सेनेचे ९ आणि काँग्रेसचा एक असे एकूण २० सदस्य निवडून आले होते. आता पूर्वीचे ६ आणि आत्ता पक्षात आलेले दहा असे भाजपचे एकूण १६ इतके संख्याबळ झाले आहे. त्यामुळे कळंब नगरपालिकेत आता विरोधकच शिल्लक राहिले नाहीत.
मल्हार पाटील यांची निर्णायक भूमिका
कळंबमधील या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमागे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली आहे. नगरसेवकांशी सातत्याने संवाद साधत त्यांनी त्यांच्या स्थानिक अडचणी आणि विकासाच्या गरजा समजून घेतल्या. केवळ राजकीय प्रवेशापुरता विषय न ठेवता, कळंबच्या विकासाला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज त्यांनी पटवून दिली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून कळंबच्या विकासाला अधिक बळ मिळू शकते, हा विश्वास नगरसेवकांमध्ये निर्माण करण्यात मल्हार पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या संवादातून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आणि त्यातूनच भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय अधिक ठाम झाला. युवा ऊर्जा, प्रभावी संवाद आणि विकासाची स्पष्ट भूमिका यांचा सुरेख मेळ साधत मल्हार पाटील यांनी कळंबच्या राजकारणात भाजपसाठी नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी केली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या प्रवेशामागील खरे सूत्रधार मल्हार पाटील असल्याचे त्यांच्या निर्णायक आणि प्रभावी भूमिकेतून अधोरेखित झाले आहे.




















