धाराशिव: धाराशिव जिल्ह्याची ओळख आता केवळ दुष्काळी जिल्हा म्हणून न राहता ‘ऊर्जा हब’ म्हणून विकसित होत आहे. जिल्ह्यात सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे १० हजार कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक होत असताना, या कंपन्यांनी आता केवळ नफा न कमवता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात वाटा उचलणे अनिवार्य आहे. कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी आता केवळ कांही आरोग्य शिबिर व तत्सम बाबीपुरता मर्यादित न ठेवता, जिल्ह्याच्या मूलभूत सुविधांसाठी वापरला जावा, असे निर्देश आपण दिले होते त्यानुसार जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारली असून आता तातडीने ‘सीएसआर’ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत.
मुंबई येथील ‘मित्र’च्या कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि विविध ऊर्जा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आतापर्यंत पवन आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा सीएसआर निधी किरकोळ बाबींवर खर्च केला आहे, मात्र यापुढे हा निधी ठोस कामांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या केटी वेअरची अर्थात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, शाळा आणि रुग्णालयांच्या इमारतींचे बळकटीकरण व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक तरुणांना प्रशिक्षणातून रोजगार मिळवून देणे, प्रकल्पांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण कंपन्यांनी स्वतःच्या खर्चाने करण्याबाबत व त्यासाठी प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पवनचक्की किंवा सौर प्रकल्पांसाठी जमीन खरेदी-विक्री करताना एजंटांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यापुढे कंपन्यांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा. जमिनीला प्रचलित बाजारभावाप्रमाणे योग्य आणि समान दर मिळावा, यासाठी प्रशासनाने दरनिश्चितीचे धोरण ठरवावे, अशी कडक भूमिका घेत आमदार पाटील यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पांच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘प्रमाणित कार्यपद्धती’ तयार केली जाईल. तसेच, कंपन्यांच्या सीएसआर निधीचा वापर पारदर्शकपणे व्हावा, यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून कामांचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
धाराशिव जिल्हा देशाच्या ऊर्जा नकाशावर : आमदार राणाजगजितसिंह पाटील
जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, ज्यांच्या जमिनीवर हे प्रकल्प उभे आहेत, त्या शेतकरी बांधवांवर अन्याय होता कामा नये. कृषी, उद्योग आणि पर्यटन या त्रिवेणी संगमातून धाराशिवच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत आहे. हरित ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात ३००० कोटींची गुंतवणूक यापूर्वीच झाली आहे. उर्वरित ७००० कोटींचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. या गुंतवणुकीमुळे धाराशिव जिल्हा केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या ऊर्जा नकाशावर ठळकपणे उमटणार आहे. प्रशासकीय स्तरावर या सगळ्या कामांचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.



























