बार्शी – बार्शी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य व चांगला दर मिळावा, तसेच मूल्यवर्धनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध शेतमाल प्रक्रिया उद्योगांच्या स्थापनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कांदा, डाळी, धान्य तसेच इतर शेतीमालावर प्रक्रिया करुन त्याचे पॅकिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेत विक्री करण्याच्या संकल्पनेवर सकारात्मक विचारमंथन झाले. प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतमालाची नासाडी टळेल, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, ‘बार्शी तालुका हा शेतीप्रधान असून केवळ कच्चा शेतमाल विकून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. प्रक्रिया उद्योगांमुळे शेतमालाला अधिक मूल्य मिळेल आणि शेतकऱ्यांना दुप्पट दर मिळण्यास मदत होईल. हंगामात होणारी नासाडी थांबेल. बार्शीत असे उद्योग सुरु झाल्यास सुमारे ५०० ते ७०० स्थानिक तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन. बार्शीचा कृषी व औद्योगिक विकास निश्चितपणे घडवून आणू.’
या बैठकीस बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, आडत व्यापारी दिलीप गांधी, संचालक रामेश्वर पाटील, प्रभाकर डमरे, उपसभापती बाबा गायकवाड, कौरव माने, प्रशांत कथले, राजेंद्र सुरवसे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, महेश बाफणा, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके, द्राक्ष बागायतदार राहुल सुरवसे, अनिल सुरवसे, सचिव तुकाराम जगदाळे, संचालक सुरेश गुंड, प्रवीण गायकवाड, भरतेश गांधी, देवा खटोड, महेश काळे, गजेंद्र मुकटे, बाबासाहेब कापसे तसेच बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतमाल प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून बार्शी परिसरातील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासह ग्रामीण भागातील रोजगारालाही चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Post Views: 4