
सोलापूर – राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा काटेकोर व प्राधान्याने वापर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात सध्या एल निनो प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत आहे.त्यामुळे गावात संभाव्य गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.त्यासाठी जिल्हयातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी राज्य व जिल्हास्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अत्यंत काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.गावात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी व जनजागृती मोहीम राबवावी, ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध जलस्रोत, साठा व पाणी पुरवठा स्थितीचे नियमित शुद्धीकरण करावे ,पाणी पुरवठा योजना, विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोत कार्यान्वित स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, बागांना पाणी देणे इत्यादी गैर-प्राधान्य कामांसाठी टाळण्याबाबत सूचना देण्यात द्याव्यात, पाणी पुरवठा योजनांची गळती, अनधिकृत नळजोडणी व पाण्याची चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलांची नियमित भरणा करावा व देखभाल दुरुस्ती च्या कामांची वेळेत पूर्तता करून योजना अखंडित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी , टंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये पर्यायी विहिरी, बोअरवेल, अधिग्रहण इ. जलस्रोत उपलब्धतेची पूर्वतयारी करावी, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणूक व भूजल पुनर्भरणाबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करावी, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी करून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणी टंचाईसंदर्भातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून समन्वय ठेवण्यात यावा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील उपलब्ध साठा ३० दिवसांपेक्षा कमी असल्यास त्याबाबतचा अहवाल तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करण्यात यावा अशी सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली आहे.
दरम्यान गावातील शासकीय कार्यालये, शाळा,अंगणवाडी, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्थांमध्ये पाणी बचतीबाबत विशेष सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्यास वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून नियमित नोंदी ठेवाव्यात व जीपीएस निरीक्षणाद्वारे नियंत्रण ठेवावे, पाणीटंचाई निवारण्यासाठी महसूल, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा व इतर संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
गावातील नागरिकांना दवंडी देऊन “पाणी आहे तितकेच वापरा, पाणी वाचवा” या संदेशाद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी जेणेकरून वरील सूचनांचे काटेकोर पालन करून पिण्याच्या पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा व संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करता येईल अशा लेखी सुचना सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आल्या आहेत असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी सांगीतले.
Post Views: 12