लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात होऊन सहाजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथील काटोल मार्गावरील सोनखाब ताराबोळी शिवारात लगत क्वालिस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण कोमात गेल्याची माहिती आहे. अजय दशरथ चिखले (वय ४५) ,विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश दत्तुजी ढोणे (वय ४०) हा कोमात आहे. हे सर्व राहणार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या गांव मेडेपठार गावातील आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब ते ताराबोडी दरम्यान हा अपघात घडला. क्वालिस कार नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. नागपुरात लग्नसमारंभ आटोपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सातही जण लग्नासाठी नागपुरात आले होते. रात्री उशिरा नागपुरात लग्नसोहळा आटोपल्यानंतर नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घात केला. नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांचा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की या अपघातात कारचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच, काही स्थानिक लोकांनीही घटनास्थळी पोहोचून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलाच्या लग्नाला जाऊन गावी परत येताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.