
सोलापूर – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या बालपिढीला वारकरी संप्रदायाच्या संस्कारांची जोड देण्याचा स्तुत्य प्रयत्न श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था आणि हरीपाठ परिवार, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला. अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिनाभर चाललेल्या वारकरी सांप्रदायिक बालसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तिपरायण सदाशिव चवरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या मुला-मुलींनी शिबिरादरम्यान आत्मसात केलेल्या विविध सांप्रदायिक कला आणि संस्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.याशिबिरामध्ये तब्बल ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. महिनाभराच्या कालावधीत विद्यार्थ्यांना भजनामध्ये टाळ कसा वाजवायचा, पखवाज वादनाचे प्राथमिक धडे, वारकरी दिंडीतील पारंपरिक पावले, श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय, पांडुरंगाष्टक तसेच संप्रदायातील नित्य नमन यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सदाशिव चवरे यांनी वारकरी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. गीतेच्या अध्यायांचे नियमित पठण केल्याने मुलांची स्मरणशक्ती आणि पाठांतर क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच शिक्षणासोबत स्वयंशिस्त, संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा वारकरी परंपरेतून मिळते, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात मुलांना मोबाईलच्या अतिरेकापासून दूर ठेवून संस्कारक्षम वाटेवर नेण्याचे कार्य करणाऱ्या बळीराम महाराज जांभळे यांच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
शिबिरामध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्यायांचे मार्गदर्शन ह.भ.प. गोविंद महाराज माने (दमानी नगर) यांनी केले. तर पखवाज वादनाचे प्रशिक्षण अनिकेत जांभळे यांनी दिले. टाळ, पाऊल आणि हरीपाठाचे प्राथमिक शिक्षण बळीराम महाराज जांभळे यांनी विद्यार्थ्यांना दिले. संस्कार, अध्यात्म आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये भक्ती, शिस्त, संस्कार आणि सामूहिकतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अंजली लोखंडे, स्वराज केसरे, तन्वी गोसावी, शौर्य भोसले आणि समर्थ कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम महाराज जांभळे यांनी केले.
Post Views: 12