सोलापूर – राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सतत विविध माहिती, अहवाल आणि आकडेवारी सादर करण्याच्या कामातून मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व प्रकारची माहिती आठवड्यातून केवळ एकदाच, म्हणजे शनिवारी वरिष्ठ कार्यालयांना सादर करावी लागणार आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी यासंदर्भातील निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला दिले आहेत. यानिर्णयामुळे शिक्षकांचा वेळ अहवाल आणि नोंदी भरण्याऐवजी प्रत्यक्ष अध्यापनासाठी वापरला जाणार आहे.
शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी शाळास्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली असून, यूडायस आणि सरल यांसारख्या विविध प्रणालींचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. याशिवाय पीएम पोषण योजनेतील नोंदवही व्यवस्थेचे सुलभीकरण करण्याचे प्रयोगही यशस्वी ठरले आहेत.
कोट
अहवाल शनिवारी सादर करण्याची मुभा
विद्यार्थ्यांची उपस्थिती, पीएम पोषण योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या तसेच विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित माहिती ही मात्र दररोज अद्ययावत ठेवावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे अहवाल शनिवारी सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
शिक्षकांनी व्यक्त केले समाधान
‘माहितीचा वार शनिवार’ हा उपक्रम कोल्हापूर, गडचिरोली, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांतील निवडक केंद्रांमध्ये पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात आला होता. या प्रयोगात ९० टक्के शिक्षकांनी समाधान व्यक्त केले, तर ९६.६ टक्के शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध झाल्याचे नमूद केले.
चौकट
हा निर्णय उपयुक्त
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना प्रशासकीय कटकटीतून दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षण व्यवस्थेसाठी सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल मानला जात आहे.
Post Views: 41