गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या वसाहतीचा (एमआयडीसी) प्रश्न आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेली जागा आता रद्द करण्यात आली आहे. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार पवार यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे. त्यानंतर आता रोहित पवारही आक्रमक झाले असून त्यांनी शिंदेंसह सरकारवरही जोरदार टीका केली आहे.
आमदार पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीसाठी पाठपुरावा केला. चापडगाव जवळची जागा त्यासाठी प्रस्तावित करण्यात आली होती. आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या सरकारकडेही त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. जीआर काढण्याच्या मागणीसाठी आंदोलनही केले. त्याच दरम्यान आमदार शिंदे यांची या प्रश्नात एंट्री झाली. ज्या जागेत ही एमआयडीसी होत आहे, त्याला स्थानिक पातळीवर विरोध असून त्यातील काही जागा नीरव मोदीच्या मालकीची असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. त्यामुळे हा प्रश्न भिजत पडला.
अखेर यावर उपाय काढण्यासाठी मंगळवारी नागपूरमध्ये उद्योगंत्री उदय सामंत, आमदार राम शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये प्रस्तावित जागेला पाटेगाव ग्रामपंचायतीचा विरोध आहे यावर एकमत झाले. याशिवाय देशाला फसवलेल्या भगोडा नीरव मोदीची जमीन प्रस्तावित एमआयडीसीत असल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. आता पंधरा दिवसांत नवीन जागा शोधून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.
रोहित पवार आक्रमक
या निर्णयाची माहिती मिळताच आमदार पवार पुन्हा आक्रमक झाले. ते म्हणाले, मागील आधिवेशनापासून याला मंजुरी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. मात्र, राजकीय कारणातून आमदार राम शिंदे यांचा या एमआयडीसीला विरोध होता. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. राम शिंदेंनी आपल्या कारकीर्दीत मतदारसंघात साधे उसाचे गुऱ्हाळ तरी उभारले आहे का? गेल्या दीड वर्षांपासून आपण एमआयडीसीसाठी पाठपुरावा करीत आहोत. सुमारे अकराशे एकर जागा त्यासाठी प्रस्तावित केली आहे. यातून वीस हजार जणांना रोजगार मिळू शकतो. मुळात शिंदे यांना यातील काही कळते का? असा सवाल विचारला.
दुसरीकडे शंभर दीडशे एकराची जागा देऊन काहीही साध्य होणार नाही. महामार्गालगतची ही जागाच योग्य आहे. येथे मोठे उद्योग यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणला आहे. जी जागा प्रस्तावित केली, तीच यासाठी योग्य आहे. गरीबांचे कल्याण होणाऱ्या या प्रकल्पात उगाच राजकारण आणू नये. यातून अनेक तरुणांची भविष्य अडचणीत आले आहे. आम्ही उद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत होतो. त्यांची केवळ सही राहिली होती. बाकी सर्वेक्षण, प्रस्ताव सगळे तयार होते. मात्र आता अचानक हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना यातील काही कळत नाही, त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे तालुक्याचे नुकसान होत आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.