पंढरपूर – ‘मेजर ध्यानचंद यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने, कठोर परिश्रमाने, शिस्तीने आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाने भारतीय क्रीडाक्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेले. राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. हा बुद्धीचा खेळ, संयमाची परीक्षा, एकाग्रतेची कसोटी आणि योग्य निर्णय घेण्याची कला आहे. आजचा राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला आठवण करून देतो की, खेळ हा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य भाग आहे.’ असे प्रतिपादन वेणुनगर (गुरसाळे, ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल प्रशालेचे क्रीडा शिक्षक आबासाहेब नवले यांनी केले.
भारताचे महान हॉकीपटू आणि ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करताना प्रमुख अतिथी आबासाहेब नवले बोलत होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना आबासाहेब नवले म्हणाले कि, ‘१९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमधील हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य असलेल्या जर्मनीचा ८-१ असा मोठा पराभव केला. या सामन्यानंतर जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यात झालेल्या संवादाची कथा भारतीय क्रीडा इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. लोकप्रिय ऐतिहासिक माहिती आणि काही वरिष्ठ क्रीडा तज्ज्ञांच्या दाव्यानुसार हिटलर आणि मेजर ध्यानचंद यांच्यातील हा संवाद होता. हिटलर म्हणाले. ‘तुम्ही हॉकी खेळण्याव्यतिरिक्त भारतात दुसरे काय काम करता?’ त्याला उत्तर देताना मेजर ध्यानचंद म्हणाले की. ‘मी भारतीय सैन्यात (ब्रिटिश भारतीय सैन्य) लान्स नाईक म्हणून कार्यरत आहे.’ यावर हिटलर म्हणाले. ‘तुम्ही जर्मनीमध्ये या. मी तुम्हाला जर्मनीचे नागरिकत्व देईन आणि जर्मन सैन्यात कर्नल (किंवा फिल्ड मार्शल) हे मोठे पद देईन. आमच्याकडून खेळा. यावर मेजर ध्यानचंद यांनी अत्यंत नम्रपणे आणि बाणेदारपणे म्हणाले ‘माझा भारत देश विकण्यासाठी नाही तर भारत ही माझी मातृभूमी आहे आणि मी तिथेच आनंदी आहे. देशाने मला पुढे नेणे ही देशाची नव्हे, तर देशाला पुढे नेणे ही माझी जबाबदारी आहे.’ ध्यानचंद यांचे हे देशप्रेमाने भरलेले हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. मात्र हिटलर त्यांच्यावर रागावेल असे वाटत असतानाच, हिटलरने त्यांच्या या राष्ट्रवादाचे तोंडभरून कौतुक केले आणि त्यांना ‘’हॉकीचे जादूगार’ म्हणून संबोधले. अशा प्रकारे मेजर ध्यानचंद यांची कहाणी ऐकवली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ म्हणाले. ‘जेंव्हा आपण बुद्धिमत्ता, रणनीती, संयम आणि एकाग्रता यांचा संगम असलेल्या खेळाचा विचार करतो, तेंव्हा बुद्धिबळ आपल्या डोळ्यासमोर येतो. तो आहे दोन बुद्धींचा सामना, संयमाची परीक्षा आणि योग्य निर्णय घेणे. विजय मिळाला तर आनंदाने स्वीकारा आणि पराभव झाला तर त्यातून शिका. कारण प्रत्येक सामना हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. म्हणून माझ्या खेळाडूंनो, आज फक्त जिंकण्यासाठी खेळू नका. शिकण्यासाठी खेळा, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी खेळा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खिलाडूवृत्तीने खेळा.’ यावेळी कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, दिनेश गावडे, प्रा. आकाश पवार, प्रा.विक्रम पाटील, फिजिकल डायरेक्टर प्रा. डी. एस. भोसले, क्रीडा समन्वयक प्रा. एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.























