सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाचे नामांतर करण्याच्या प्रस्तावावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेले ‘शिवरत्न’ हे नाव कायम ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषदेच्या सभागृहाला सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘शिवरत्न’ हे नाव देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवलेले हे नाव जिल्ह्याच्या इतिहासाशी आणि जनभावनांशी जोडले गेले असून, त्याचे नामांतर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेऊन ‘शिवरत्न’ हे नाव पूर्ववत कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलून भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याबाबत कोणताही विरोध नसून, त्यांच्या नावाने नवीन सभागृह किंवा अन्य सार्वजनिक वास्तू उभारून त्यास त्यांचे नाव द्यावे, अशी पर्यायी भूमिका मांडण्यात आली आहे. एका ऐतिहासिक आणि जनमानसात रुजलेल्या नावाचे नामांतर करण्याऐवजी दोन्ही महापुरुषांचा सन्मान राखणारा निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या निर्णयाविरोधात स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरत शेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 7