मंगळवेढा – समाजातील विविध प्रश्न व समस्या वादातून नव्हे, तर विचारमंथन, संवाद आणि परस्पर समन्वयातून सोडविल्या जाऊ शकतात. सामाजिक सद्भाव हा केवळ विचार नसून तो व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आचरणातून निर्माण होणारा संस्कार आहे, असे प्रतिपादन स्वानंद कुलकर्णी यांनी केले.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सामाजिक सद्भाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सद्भाव, पंचपरिवर्तन, सांस्कृतिक जाणीव, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
स्वानंद कुलकर्णी म्हणाले, भारतीय संस्कृतीची ओळख विविधतेतील एकतेत आहे. रामायण, महाभारत आणि भारतीय ज्ञानपरंपरेतून समाजाला एकत्र ठेवणारे अनेक विचार मिळतात. आजच्या पिढीला आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्याचे प्रयत्न होत असताना तरुणांनी वास्तव समजून घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजातील दोष दूर करण्यासाठी वादापेक्षा संवाद आणि एकत्रीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा संयोजक विजय वाघमोडे म्हणाले, मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी समाजातील विविध जाती, संस्था आणि घटकांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. यासाठी स्वबोध, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या पाच सूत्रांवर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून काम करणे गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद वाढविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जातीय भेद दूर करून सामाजिक सलोखा निर्माण करणे तसेच सार्वजनिक जीवनात आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका संयोजक दिगंबर यादव यांनी प्रास्ताविकात हिंदू धर्माचे विचार व श्रेष्ठत्व, संत-राजांची परंपरा तसेच भक्ती आणि शक्ती परंपरेचे महत्त्व विशद केले. छत्रपती संभाजी महाराज, संत जगनाडे महाराज, संत रविदास महाराज व संत गोरा कुंभार यांचे कार्य तसेच धनगर, गिसाडी, वैदू, नाथ डवरी, रामोशी, मेहतर यांसह विविध समाजघटकांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान, स्त्रीचा सन्मान आणि हिंदू समाजातील विविध घटकांचे संघटन यासाठी सामाजिक सद्भावाच्या माध्यमातून कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान सर्व उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पेरूचे रोप भेट देण्यात आले.
याप्रसंगी एकात्मता मंत्र व सांघिक पद्य ओंकार चिटणीस यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पवार तर आभार दामाजी पडवळे यांनी मानले.
Post Views: 5