सोलापूर – “निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ पर्यावरण अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, प्रदूषणमुक्त परिसर आणि वृक्षसंवर्धन यांचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी आहे. प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासोबत आरोग्य संवर्धनालाही प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या श्रुतीताई भोरगुंडे यांनी केले.
तर, “पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. आजच्या पिढीने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तरच भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळू शकेल,” असे सरपंच श्रुतीताई निकंबे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत सरपंच श्रुतीताई निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा उत्साहात पार पडली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रेमदास पवार यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करताना सांगितले की, “पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार केल्याशिवाय निरोगी व शाश्वत भविष्य घडू शकत नाही.”
यावेळी पंचायत समिती सदस्य सुरज पाटील, माजी सरपंच गेनसिद्ध भोरगुंडे, माजी उपसरपंच विजयकुमार शबाशे, महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष निकंबे, नागनाथ निकंबे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मंगरुळे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव माळी, शशिकांत बिराजदार, जेटप्पा नाटेकर, राजकुमार पट्टणशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
विशेष ग्रामसभेत “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या मिशन लाईफ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याची आवश्यकता तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पंचायत समिती सदस्य सुरज पाटील यांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. “माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव” या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामसभेत वृक्षलागवड, पाणी संवर्धन, कचरा निर्मूलन आणि प्लास्टिकमुक्त गाव या विषयांवर ग्रामस्थांनीही आपली मते मांडली. पर्यावरण संरक्षणासाठी गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
ग्रामसभेनंतर ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण झाली असून कुंभारी ग्रामपंचायतीने हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक गाव निर्मितीकडे आणखी एक भक्कम पाऊल टाकल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 6