आयोजकांवर गुन्हा दाखल, भोलेबाबाचे नाव वगळले
हाथरस, 03 जुलै (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मरणाऱ्यांचा आकडा 121 झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयोजक सेवेदार देवप्रकाश मधुकर आणि अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केलाय. परंतु, प्रवचन देणारा सूरजपाल उर्फ भोलेबाबा याचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आलेय.
कार्यक्रमस्थळी झालेली ही चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की काही वेळातच मृतदेहांचा ढीग पडला होता. सर्व पिडीत भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी सत्संगाला आले होते. या प्रकरणाचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोले बाबाचे मुख्य सेवक म्हणून ओळखले जाणारे देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 105, 110, 126 (2), 223 आणि 238 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये प्रवचन देणारे सूरजपाल उर्फ भोले बाबाचे नावच नाही. पोलिसांच्या कारवाईत भोले बाबाचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हाथरसच्या सिकंदरराव पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजून 18 मिनिटांनी हा एफआयआर नोंदवण्यात आला. ब्रजेश पांडे नावाच्या व्यक्तीने हा एफआयआर दाखल केला आहे. मुख्य सेवेदार देवप्रकाश याच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भोले बाबाचे नावाचे एफआयआरमध्ये नसल्याने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोक सेवेदारांच्या मागे जात नाहीत, भोले बाबामुळे लोक तिथे आले. भोले बाबाला मुख्य आरोपी मानले पाहिजे असे मृतांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. परंतु, आयोजकांनी केवळ 80 हजार लोक येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. परंतु, सकाळपासूनच कार्यक्रम सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता उपस्थित होतो आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभारी मंत्री असीम अरुण मंगळवारी रात्री उशिरा हाथरसला पोहोचले. त्यांनी हाथरसच्या जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली. “या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली आहे. ज्याची चौकशी करून 24 तासांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अहवाल सादर करणार असल्याचे असीम अरुण यांनी सांगितले.