सोलापूर : जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि करुणा या सार्वकालिक मूल्यांचा जागर करणारा भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सव वालचंद शिक्षण समूहातील डब्ल्यू.आय.टी. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जैन मंदिरात अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यात्म, संस्कार आणि शिस्त यांचा सुंदर संगम अनुभवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. भगवान महावीरांच्या मूर्तीचे प्रक्षाल करून विधिवत पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंत्रोच्चारांच्या मंगलध्वनीत केसरी पंचा व धोतर परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी साकारलेले वातावरण भक्तिरसाने भारलेले होते. मंदिर ध्वजारोहणानंतर पालखीमध्ये भगवानाची मूर्ती प्रतिष्ठापित करून भजन-कीर्तनाच्या तालावर पदयात्रा काढण्यात आली. संपूर्ण परिसर ‘अहिंसा परमो धर्मः’ या संदेशाने दुमदुमून गेला.
सकाळी ६.४० वाजता वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी सौ. माया गांधी यांच्या सह ध्वजारोहण करून महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, सौ. संगीता गांधी, वैभव गांधी, पराग शहा यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रभातफेरी व भव्य शोभायात्रा (पालखी) काढण्यात आली. महाविद्यालय परिसर प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात येत पालखी विसर्जित करण्यात आली.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक झांकी विशेष आकर्षण ठरल्या. पाच पापे आणि त्यांच्या परिणामांचे चित्रमय दर्शन घडविणाऱ्या रेखाटन टप्प्यापासून ते नरकदर्शनाद्वारे पापांचे भयावह परिणाम प्रभावीपणे उलगडण्यात आले. दुसऱ्या टप्प्यांत कुंडलपूर मंदिराचे दर्शन, तसेच त्रिलोक आणि चार गतींचे सखोल चित्रण सादर करण्यात आले. जीवनातील दु:खाचे मूळ आणि त्यावर उपाय यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.
पांडुकशिला व सजावटीच्या माध्यमातून ‘सदाचार, संयम आणि नियमित साधना यांद्वारे मुक्तीचा मार्ग’ अधोरेखित करण्यात आला. मुलींनीदेखील बारा भावनांचे उत्कृष्ट चित्रीकरण करून जीवन सुधारण्यासाठी प्रभावी संदेश दिला. या माध्यमातून जैन तत्वज्ञानातील आत्मशुद्धी आणि आचरणातील सातत्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आले.
यावेळी प.पू. १०८ धवलसागरजी महाराज यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आशीर्वाद दिला, तर प.पू. १०८ मंथनसागरजी महाराज यांचेही सानिध्य लाभले. मुनिश्रींनी विद्यार्थ्यांना नियमित मंदिरात येऊन अभिषेक व साधना करण्याचे मार्गदर्शन केले.
अहिंसा, सदाचार आणि आत्मोन्नतीचा संदेश देणारा हा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा प्रेरणादायी दीपस्तंभ ठरला. समाजात सकारात्मकता, एकात्मता आणि आध्यात्मिक ऊर्जा जागवणारा हा उपक्रम वालचंद शिक्षण समूहाच्या संस्कारप्रधान परंपरेची साक्ष देणारा ठरला.



















