जालना प्रतिनिधी : मंठा तालुक्यातील पाटोदा येथील तुकाराम आबासाहेब श्रावणे या 19 वर्षीय तरुणाच्या हत्ये प्रकरणी व यातील आरोपींनी याआधी केलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून यातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी , या मागणीसाठी पाटोदा येथील गावकऱ्यांनी रॅली काढून मंठा पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी निवेदन स्वीकारले.
पाटोदा येथील गावकऱ्यांच्यावतिने (ता.22) सोमवार रोजी मंठा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत रॅली काढण्यात आली. आरोपींना कठोर शासन करण्यात यावे व यातील आरोपींनी या अगोदर केलेल्या गुन्ह्याची देखील चौकशी करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गावकऱ्यांनी “मारेकऱ्यांना फाशी द्या” या मागणीचे फलक हातात घेऊन घोषणा देत रॅली काढली. तसेच पाटोदा येथील नागरिकांच्या भावना माननीय न्यायालयाच्या दरबारात मांडाव्यात असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने गावातील महिला , तरुण व नागरिकांची उपस्थिती होती.