धाराशिव – रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार आणि दत्ता पवार आदींनी संयुक्त निवेदन सादर केले.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती रविराज साबळे-पाटील हे सध्याच्या शेतकरी आंदोलन, शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील चर्चांवर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये सोशल मीडियावर करत असून, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष आणि गोंधळ निर्माण होत आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील बैठकांचा चुकीचा अर्थ लावून अफवा पसरवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “सध्याच्या काळात शेतकरी अतीवृष्टीमुळे अडचणीत आहे. त्याला मदत मिळावी म्हणून शेतकरी नेते सरकारशी संवाद साधत आहेत. मात्र, संबंधित व्यक्ती हे आंदोलनाशी कोणताही संबंध नसताना चुकीची माहिती पसरवत आहेत, ज्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो.”
तक्रारीत संबंधित व्यक्तीवर BNS कलम 197(1)(D) तसेच IT Act अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात रविराज साबळे-पाटील यांचा इंस्टाग्राम लिंक व मोबाईल क्रमांक (9021361877) नमूद करण्यात आला असून, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील दिशाभूल करणारी माहिती ही संवेदनशील ठरू शकते. त्यामुळे सायबर पोलिसांकडून याप्रकरणी तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.






















