सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रिसिजन गप्पा 2025” या सांस्कृतिक मेजवानीचा तिसरा आणि अंतिम दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी अर्पण करण्यात आला. सामाजिक जाण आणि योगदानाचा गौरव करणाऱ्या या दिवशी, शहर आणि जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना ‘प्रिसिजन सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर सन्मान सोहळ्याची मुख्य सूत्रधार म्हणून प्रख्यात वक्ते, पत्रकार आणि मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सुमेधा चिथडे यांना ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’
सोल्जर्स इंडिपेन्डंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातील सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करून तेथील सैनिक आणि पर्यटकांना जीवनदायी श्वास देण्याचे कार्य श्रीमती सुमेधा चिथडे यांनी केले आहे. तसेच सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांचे पुनर्वसन करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना ३ लाख रुपयांचा *प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अधिक कदम यांना ‘सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार’
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवाद, युद्ध आणि अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य अधिक कदम यांनी गेल्या ३० वर्षांपासून निष्ठेने केले आहे. कुपवाडा, अनंतनाग, जम्मू अशा संवेदनशील भागांमध्ये शिक्षण, आश्रय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे त्यांचे योगदान विलक्षण आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून त्यांना २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला *“प्रिसिजन सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार”* प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. उदय निरगुडकर यांनी सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची संवादात्मक मुलाखत घेतली. “सामाजिक ज्ञान आणि भान जपणे हेच खरे राष्ट्रसेवेचे लक्षण आहे”, “Beyound yourself… Before yourself…”, “देशासाठी कार्य करणारे सैनिक कधीच उठाव किंवा मागण्या करत नाहीत — ते फक्त आपले कर्तव्य पार पाडतात” अशा विचारांनी सुमेधा चिथडे यांनी रसिकांना विचारमंथन करायला भाग पाडले.
अधिक कदम
गेल्या दोन दशकांपासून पूर्ण मुस्लिम व दहशतवादग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिक कदम यांनी सांगितले की, “काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम यांचा DNA एकच आहे. फरक फक्त धर्माचा आहे, पण माणुसकी तीच आहे.” त्यांनी काश्मिरीयत आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यामधील साम्यही अधोरेखित केले.
“माझ्यावर कधीच इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आला नाही,” असे ते म्हणाले. दहशतवाद्यांनी एकूण 19 वेळा त्यांना उचलून नेले, तरीही त्यांनी मानवतेचा मार्ग सोडला नाही. अनेक काश्मिरी मुलींचे शिक्षण पूर्ण करून देणे आणि विवाहाची जबाबदारी उचलणे हे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
त्यांच्या संघर्षमय प्रवासातील या अनुभवांनी उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. “प्रिसिजन गप्पा”च्या या संवादातून सहिष्णुता, शिक्षण आणि मानवतेचा प्रभावी संदेश पोहोचला.
कार्यक्रमाच्या शेवटी विलास कुलकर्णी यांचे अभंग सादरीकरण झाले.अधिक कदम हे उत्तम पखवाजवादक असल्याने विलास कुलकर्णी यांच्या अभंगाला अधिक कदम यांनी पखवाजाची साथसंगत केली.
सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या मांडत, सेवाभावी व्यक्तींना सन्मानित करून “प्रिसिजन गप्पा 2025” या वर्षाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला.
*प्रिसिजन सेवा सन्मानाचे मानकरी*
1. सौ. ऋचा पाठक – वृत्तपत्र विक्रेत्या. सोलापूर
2. श्रीमती. अंबिका पानगंटी- पहिल्या महिला रिक्षाचालक व प्रशिक्षक. सोलापूर
3. श्री. मोहन तलकोक्कुल – मनोरूग्ण आणि बेघरांसाठी कार्य. सोलापूर
4. श्री. रामचंद्र वाघमारे – व्यसनमुक्तीसाठी कार्य. सोलापूर
5. श्री. राहुल बिराजदार – मासिक पाळी संबंधात प्रबोधन. सोलापूर
6. श्री. अतुल गवळी – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.
7. श्री. विजयसिंह उबाळे – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.
8. श्री. कैलास काटकर – सलूनमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळीला प्रोत्साहन. मोडनिंब, माढा.
9. श्री. राजू डोलारे – कोरोना काळात ३८०० अंत्यविधी. चित्रकार. सोलापूर.
10. श्री. संजय बैरागी – स्वतः अंध असून अंधांसाठी विविध कार्य. कुर्डुवाडी, माढा.
















