पंढरपूर – सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्या नंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या पुढे तिर्थक्षेत्र पंढरपूरातील प्रलंबित विविध विकास कामांना गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पंढरपूरातील नागरिक तसेच केंद्र व राज्यशासना मध्ये सुवर्णमध्य साधित कार्तिकेयन यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीमप्रोजेक्ट असलेला पंढरपूर काँरिडोर प्रकल्प राबविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची तडकाफडकी नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी शुक्रवारी पंढरपूरात येवून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन सोलापूऱच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून देशभर प्रसिध्द असलेल्या तिर्थक्षेत्र पंढरपूर बद्दल राज्य तसेच केंद्र शासनातील राज्यकर्त्यांचे विशेष लक्ष आहे.कारण केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभर पसरलेल्या वारकरी सांप्रदायाची मने जिंकावयाची असतील तर पंढरपूरचा सर्वांगांने विकास साधणे आवश्यक आहे हे या राज्यकर्त्यांनी अचूक हेरलेले आहे. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी,उज्जैनच्या धर्तीवर तिर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास झाला पाहिजे यासाठी पंढरपूर काँरिडोरची घोषणा केलेली आहे. या संदर्भात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मुंबई येथे मध्यंतरी पंतप्रधानाची तिर्थक्षेत्र पंढरपूरा संदर्भातील भूमिका देखील विषद केलेली आहे.
तिर्थक्षेत्र पंढरपूरचा नावलौकीक येथील विठ्ठल रखुमाईच्या वास्तव्याने देशभर नव्हे तर साता समुद्रापार पोहचलेला आहे. येथे भरणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रांसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. या बरोबरच पंढरपूरात दररोज देखील ५० ते ६० हजार भाविकांचा राबता असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना,शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवासुविधा कशा प्राप्त होतील यासाठी राज्य शासनाकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे पंढरपूरवर विशेष लक्ष आहे.
त्यामुळेच तिर्थक्षेत्र पंढरपूरसाठी आत्तापर्यंत केंद्र शासनाच्या नमामी गंगेच्या धर्तीवर राज्यशासनाकडून नमामी चंद्रभागा अभियान, वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर काँरिडोर तसेच येथील विठ्ठल मंदिराला पुरातन लुक देण्यासाठी सुरु असलेले विकास काम या बरोबरच पंढरपूरातील अरुंद गल्लीबोळातून मोठ्या यात्रांच्यावेळी मोठी गर्दी होत असल्याने राबविला जाणारा डी.पी.प्लँन आदींची कामे जिल्हाधिकारी कुमार आर्शीर्वाद यांनी काही प्रमाणात मार्गी लावलेली आहे. मात्र आशीर्वाद यांना ती प्रत्यक्ष राबविता आली नाहीत. कारण यासाठी त्यांच्याकडून आत्ता पर्यंत नुसत्या तारीख पे तारीख दिल्या गेल्या. काही दिवसांपूर्वीच पंढरपूर काँरिडोर प्रकल्पास येत्या दोन ते तीन महिन्यात सुरुवात केली जाईल असे आशीर्वाद यांनी जाहीर केले आहे.
वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने कुंभमेळ्या पेक्षा अधिक महत्वाचा असलेला आषाढी यात्रेचा सोहळा देखील अवघ्या दोन ते तीन महिन्यावर येवून ठेपलेला आहे. त्या अगोदर दर तीनवर्षातून एकदा येणारा धोंडा महिना किंवा अधिकमास आहे. त्या महिनाभरात देखील भाविकांची मोठी गर्दी येथे होणार हे गृहित धरुन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पालिका यांच्याकडून योग्य प्रकारे नियोजन करुन घेण्याचे कसब जिल्हाधिकाऱ्यांना पार पाडावे लागणार आहे
विठ्ठल मंदिराचे काम देखील अगदी संथ गतिने सुरु आहे. मध्यंतरी निधी अभावी हे काम देखील ठप्प झालेले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच निधीची तरतूद झाल्याने पुन्हा काम सुरु झालेले आहे. मंदिराचे हे काम देखील दोन, तीन टप्प्यात होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यालाच जर ऐवढा वेळ लागत असेल तर पुढच्या टप्प्यांचे काय असा सवाल देखील महाराज मंडळी तसेच वारकरी भाविकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे सुरु असलेल्या कामासाठी देखील निधीची योग्य प्रकारे तरतूद कशी होईल यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना सतत शासनदरबारी पाठपुरावा करावा लागणार आहे.
काँरिडोर बाबत देखील आशीर्वाद यांनी बऱ्यापैकी काम करुन ठेवलेले आहे. मात्र काँरिडोर प्रकल्पाला मंदिर परिसरातील संभाव्य बाधित नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे मध्यंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार समाधान आवताडे यांनी देखील हा महत्वकांशी प्रकल्प आता शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरात लवकर तो राबविला जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील संभाव्य बाधित नागरिकांशी देखील योग्य प्रकारे संवाद साधुन काँरिडोर प्रकल्प राबविण्याचे कसब पार पाडताना नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा तालुका म्हणून पंढरपूरचा नावलौकीक आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या कार्यकाळात पंढरपूरात केलेल्या विशेष कामांमुळे तो अधिकारी प्रसिध्दीच्या झोतात आल्याचे आपण पाहिलेले आहे आणि ज्याने विशेष मेहनत घेऊन काम केलेले नाही अशा आधिकाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून नजरेआड केल्याची देखील अनेक नावे सांगता येण्यासारखी आहेत.
त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या समोर तिर्थक्षेत्र पंढरपूरातील एक,एक प्रलंबित विकास कांमाच्या आव्हानांचा डोंगर उभा ठाकलेला आहे. मात्र या मधून जिल्हाधिकारी कसा मार्ग काढून पंढरपूरातील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांना कशी गती प्राप्त करुन देतात हे पाहणे येथील नागरिकांच्या दृष्टीने येत्या काळात ओत्सुक्याचे ठरणारे आहे.


















