सोलापूर – रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी सोलापूर बंद करण्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दत्तनगर येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुनम गेट या मार्गावर हा महामोर्चा काढण्यात येणार असून, मोर्चाचे नेतृत्व स्वतः कॉ. आडम मास्तर करणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने रिक्षा चालक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून आहे. मात्र, शहरातील अनेक एलपीजी पंप बंद असल्याने चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उपलब्ध पंपांवरही अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय एलपीजीच्या वाढत्या दरामुळे चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल रोजी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी, रिक्षा संघटना प्रतिनिधी आणि पंप चालक यांची संयुक्त बैठक १० एप्रिलपर्यंत घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही बैठक झालेली नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. कॉ. आडम मास्तर यांनी या संदर्भात पुन्हा पालकमंत्र्यांना पत्र देत तातडीने संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे. सध्या शहरातील सात एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शहरातील सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करणे, गॅस दरात कपात करणे तसेच नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या महामोर्चाला विविध रिक्षा संघटना व वाहतूक संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले. कृती समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस ॲड. अनिल वासम, चाँदसाब मुजावर, शाबूद्दीन शेख, रफिक काझी, प्रदीप शिंगे, राजू शिदगणे, अमोल दुरके, रियाज सय्यद, कॉ. एम. एच. शेख, युसुफ शेख, महिपती पवार, अतिश शिंदे, अकील शेख, आसिफ पठाण आदी उपस्थित होते.
सात गॅस पंप बंद; रोजगारावर परिणाम
सध्या शहरातील सात एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. यामुळे दैनंदिन उत्पन्न घटल्याने चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
प्रमुख मागण्या काय?
रिक्षा चालकांच्या मागण्यांमध्ये सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करणे, गॅस दरात कपात करणे तसेच नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
























