मोहोळ – जकराया शुगरचे अध्यक्ष तथा कुरुल गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासह भीमा नदीकाठच्या भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असून, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना देखील यामुळे गती मिळणार आहे.
या संदर्भात सचिन जाधव यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले होते. मागील चार ते पाच दिवस त्यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आणि निर्णयासाठी ठोस पाठपुरावा केला.त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा ठामपणे मांडला. त्यानंतर आज जलसंपदा विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे भीमा नदीकाठच्या अनेक गावांतील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. शेतीपयोगी पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या योजनाही सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होणार आहे.
या सकारात्मक निर्णयाबद्दल सचिन जाधव यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. तसेच या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पुढेही अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याची ग्वाही सचिन जाधव यांनी दिली आहे.
कुरुल जिल्हा परिषद गटातील वडदेगाव, अर्धनारी, इंचगाव, घोडेश्वर, आरबळी ,मिरी ,येणकीया गावातील शेतकऱ्यांची पिके भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.या गावातून हजारो हेक्टर ऊस पिकवला जातो. भीमा नदी ठणठणीत कोरडी पडल्यामुळे ऊस पिकासह इतर पिके धोक्यात आली होती. मतदार संघात फिरत असताना शेतकऱ्यांनी भीमा नदीत पाणी सोडण्यास बाबत वारंवार मागणी केली. याची दखल घेऊन मी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे.
सचिन जाधव, सदस्य: जिल्हा परिषद



















